अहिल्यानगर : येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागाच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला असून पृथ्वीराज मोहोळ हा ६७ वा महाराष्ट्र केसरी बनला आहे. पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना चांगलाच रंगला होता. यात मोहोळने २ गुण मिळवित गायकवाडचा पराभव केला.
या लढतीपूर्वी पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला होता. यात शिवराज राक्षेचा पराभव झाला होता. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. राक्षेने पंचाला लाथ मारल्याने हा प्रकार घडला आहे. पंचांचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने हे कृत्य केले. यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचे दिसून आले. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले.
अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अनेक जिल्ह्यांतील विविध तालमीत प्रशिक्षण घेतलेले ८६० मल्लांनी यात नोंदणी केली होती. महाराष्ट्र केसरी २०२५ ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाला. पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला, तर माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगला होता. या लढतींमध्ये महेंद्र गायकवाड यांनी मैदान मारले. त्यानंतर महाराष्ट्र केसरी किताबासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगला होता.