नांदेड (प्रतिनिधी)
येथील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील सर्व परिचित व्यक्तीमत्व तथा बीआरएस पक्षाचे नेते प्रा. यशपाल भिंगे यांनी रविवार दि. १४ एप्रिल रोजी नागपूर येथे दीक्षा भूमीला जाऊन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ सभागृह नेते बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, अतूल लोंढे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध असलेले प्रा. यशपाल भिंगे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. दरम्यान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. त्यांना जवळपास पावणेदोन लाखांचे मताधिक्य मिळाले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य कोट्यातून त्यांच्या नावाची विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी शिफारस करण्यात आली होती. मात्र तत्कालीन राज्यपाल यांच्या असंवैधानिक भूमिकेमुळे त्यांना संधी मिळू शकली नाही.
अलिकडेच त्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसच या देशाचे संविधान व लोकशाही मुल्ये जोपासून सर्वसामान्यांचे कल्याण करु शकते या धारणेतून प्रा. यशपाल भिंगे हे काँग्रेस नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आग्रही झाले. दरम्यान रविवार (ता.१४) रोजी त्यांनी नागपूर येथे दीक्षा भूमीला जाऊन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले त्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ सभागृह नेते बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.