कणकवली – ‘केंद्रात असलेले दोघे सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटून नेत आहेत; पण आम्ही लूट होऊ देणार नाही. तुम्ही महाराष्ट्रातून जे वैभव लुटून नेले, जे प्रकल्प पळवले ते केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा आम्ही परत आणणार आहोत,’ अशी ग्वाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.
तसेच, ‘राणेंना दोन वेळा इथल्या जनतेने गाडलेय, त्यामुळे त्यांनी पोकळ धमक्या देऊ नयेत. तिस-या निवडणुकीतही राणेंना जनता गाडणार आहे,’ असेही ते म्हणाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवलीत ठाकरे यांची सभा झाली. यावेळी ठाकरे म्हणाले, ‘मोदी आणि शहा यांनी संपूर्ण देश नासवून टाकला आहे.
आता गद्दारांना सोबत घेऊन महाराष्ट्र लुटीचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे; पण तुम्ही महाराष्ट्रातून जे जे प्रकल्प पळवले, ते एकेक वेचून आम्ही परत आणणार आहोत. मोदी सरकार कोकण उद्ध्वस्त करायला निघाले आहे. जैतापूर, बारसू प्रकल्पानंतर आता सिडकोच्या माध्यमातून संपूर्ण कोकण किनारपट्टीही परप्रांतीयांना देण्याचा घाट घातला जातोय. मात्र, त्यालाही आम्ही कडाडून विरोध करणार आहोत.’
‘पूर्वीच्या भाजपबद्दल मला आदर आहे; पण सध्या मोदी, शहा यांच्या भाजपचे हिंदुत्व हे बुरसटलेले आहे. असल्या भेकड भाजपपासून आम्ही फारकत घेतली,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
मुखर्जींबद्दल बोला
‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आम्हाला हिंदुत्वचे आव्हान देत आहेत; पण ज्या जनसंघाची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली, त्या श्यामाप्रसाद यांनी बंगालमध्ये मुस्लिम लीगसोबत सरकार स्थापन केले होते. काँग्रेसने सुरू केलेल्या चलेजाव चळवळीला विरोध करून ब्रिटिशांना साथ दिली होती. त्यामुळे बुरसटलेल्या हिंदुत्ववादी शहांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याऐवजी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावर आधी चर्चा करावी,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.