उत्तर सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून शहराचा पारा वाढतच असून, तहान भागवण्यासाठी थंड पाणी गरज वाढली आहे. सध्या घरी, हॉटेल्स, मेस, खासगी कार्यालयात, लग्न समारंभ, व इतर कार्यक्रमात सर्रास मोठ्या प्रमाणात थंड पाण्याच्या जारला मागणी वाढली आहे. मात्र, या पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही खात्री देता येत नसल्याने जारमधील थंड पाणी शरीरासाठी अपायकारक ठरू शकते, त्यामुळे असे थंड पाणी पिताना सावधानता बाळगणे गरजेचे झाले आहे.
जारमध्ये पाणी फिल्टर न करता फक्त थंड करून २५ ते ३० रुपयाला विकले जात आहे. या पिण्याच्या पाण्याची प्रयोग शाळेत गुणवत्ता तपासली जात नसून पाणी विक्रेत्याकडे मागणी वाढली की, गुणवत्ता ढासळते. सध्या तापमान वाढत असल्याने सर्वांना थंड पाण्याची आवश्यकता भासते.त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून घरी जारचे पाणी मागवले जाते. याकालावधीत पाण्याची मागणी मोठ्याप्रमाणात वाढते. त्यामूळे दरही वाढविण्यात येतात. मात्र, पाणी विक्रेते फिल्ट्रेशनकडे दुर्लक्ष करीत असल्याचे यापूर्वीही अनेकदा उघड झाले आहे.
याबाबत नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. संबंधित विभागानेही पाणी तपासणीची मोहीम आखणे गरजेचे आहे.आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करत आहे का असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. अनेक बोरवेल्समधील पाणी हे क्षारयुक्त असून या पाण्याने पोटाचे व किडनी स्टोनचा आरोग्यावर परिणाम होत आहे. हेच बोअरवेलचे पाणी मशिनद्वारे थंड करून ते जारमध्ये भरले जाते. मात्र, ते पाणी पिणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आजारांना निमंत्रण देणारे ठरू शकते. या जारमधील पाण्याच्या शुद्धतेबाबत संबंधित विक्रेत्यांकडून कोणतीही उपाययोजना होत नसून. नागरिक मागणी करत असल्यामुळे सध्या अशा थंड पाण्याची विक्री शहरात जोरात आहे. नागरिकांच्या आरोग्याची सर्रासपणे हा खेळ सुरू असून, जारच्या प्लांटला भेट देऊन जारमधील पाण्याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.