23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रकधीही छत्रपतींचे नाव न घेणा-यांना रायगड आठवला; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

कधीही छत्रपतींचे नाव न घेणा-यांना रायगड आठवला; राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

कल्याण : आपल्याकडचे महापुरुष जातीमध्ये विभागून टाकलेत. महापुरुषावरील राजकारण सध्या सुरू आहे. त्यामुळे कधीही छत्रपतींचे नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांवर निशाणा साधला.

शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाचे लॉन्चिंग रायगडावर केले त्याबाबत पत्रकारांनी राज यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, तुतारी चिन्ह मिळाले मग फुंका, मी काय करू त्याचं? जर तुम्हाला आठवत असेल तर मी मुलाखतीतही शरद पवारांना प्रश्न विचारला होता. तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर नाव घेता पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. कारण शिवछत्रपतींचे नाव घेतले तर मुस्लिमांची मते जातात अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना काहीतरी आठवले असे राज ठाकरेंनी सांगितले.

तसेच महाराष्ट्राचा जो राजकीय विचका झालेला आहे. त्याबद्दल कुणी माध्यमांना सांगितले होते का? झाल्यावर कळाले. महिनाभरावर निवडणूक आलीय त्यामुळे काही काळ संयम ठेवा. राज्यात दुष्काळ, बेरोजगारीचा प्रश्न आहे. या सर्व गोष्टींवरून लक्ष विचलित करण्यासाठी जातीचा आधार घेतला जातो. संपूर्ण महाराष्ट्र विस्कळीत करणे जे कुणाचे ध्येय असेल आणि राज्य त्याला बळी पडत असेल तर हे दुर्दैव आहे असेही राज ठाकरेंनी म्हटले.

जनतेने वठणीवर आणणे गरजेचे
लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू आहे. २०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चिखल झाला. मी विधानसभेत गेलो होतो, समोर बसलेले लोक कुठल्या पक्षात आहेत हेच कळत नव्हते. लोकांनी वठणीवर आणले नाही आणि आपण करतोय ते योग्य असे त्यांना वाटत राहिले तर राज्यात आणखी चिखल होणार. केवळ एका व्यक्तीच्या नावाने खालचा बेस तयार होत राहिला तर हे पोषक वातावरण नाही असे आवाहनही राज ठाकरेंनी जनतेला केले.

आमदार गणपत गायकवाड इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल, त्या माणसाची मानसिक स्थिती अशी का झाली, ती कुणी आणली यामागे सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करण्याइतपत का भूमिका घेतली ते कोर्टात उघड होईलच अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी कल्याणच्या गोळीबार प्रकरणावर दिली.

‘ईव्हीएम’चा आग्रह का?
मी आधी बोलतो ते नंतर पटते, मी मराठा आरक्षणाबाबत जे म्हटलं, त्याचं काय झालं? जगभर सगळ्या पुढारलेल्या देशात शिक्क्यावर मतदान केले जाते मग आपणच का ईव्हीएम घेऊन बसलोय, मी ज्याला मतदान केले त्याला ते मिळाले का हे कळत नाही. मध्यंतरी स्लीप येत होत्या पण त्या व्हिव्हिपॅटही सगळ्या ठिकाणी नाही. मी पहिल्यांदा यावर बोललो तेव्हा अनेकांनी माझ्यावर टीका केली होती असा टोला राज ठाकरे यांनी टीकाकारांना लगावला.

राज्यात राष्ट्रीय पक्ष नको
मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा हे बोलतोय, इतकी वर्ष हा लढा सुरू आहे. मराठी भाषेचा अभिमान असणारे किती राजकारणी आहेत, त्यांना देणे घेणे नाही. अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिले असे विचारणारे लोक आपल्याकडे आहेत. मी नेहमी सांगतो, राज्याराज्यात राष्ट्रीय पक्षांची गरज नसते. तिथे राज्यातले पक्ष पाहिजेत. राज्यातील पक्षच अशाप्रकारे दबाव आणू शकतात आणि त्यानंतरच या गोष्टी होतात असं राज ठाकरे यांनी सांगितले.

निवडणूक आयोग ५ वर्ष काय करते?
निवडणूक आयोग ५ वर्ष काय काम करते, तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी करता येत नाही का? निवडणुकीसाठी शिक्षक कामाला जुंपले जातात. शाळा संपल्यानंतर शिक्षकांना कामाला लावणार आहेत, तुम्ही करून बघा. मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक असतात. त्यांना इतर कामे का लावता? असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी विचारला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR