नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात सर्वांत जास्त गाजणारे प्रकरण म्हणजे यंदाची नीट परीक्षा. नीट-यूजी परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. यावेळी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला महत्त्वाची माहिती दिली आहे. २०२४ परीक्षेमध्ये ग्रेस मार्क मिळालेल्या १५६३ विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड रद्द केले जातील. तसेच या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल, असे केंद्र सरकारने कोर्टात सांगितले.
दरम्यान, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणा-या नीट-यूजी परीक्षेमध्ये १५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क मिळाले आहेत. या विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड रद्द करण्यात येतील. याशिवाय, या १५६३ विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा पर्याय दिला जाईल, असे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले आहे.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदिप मेहता यांचे सुटीकालीन बँच याप्रकरणी सुनावणी घेत आहे. याप्रकरणी अलख पांडे यांनी नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्कबाबत आक्षेप घेतला होता. याप्रकरणी त्यांनी याचिका दाखल केली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले होते.
पांडे यांनी याचिकेमध्ये म्हटले होते की, नीट परीक्षेदरम्यान घोटाळा झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. नीटच्या परीक्षेमध्ये तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्ग मिळाले आहेत. त्यामुळे परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून त्यांनी आंदोलन केले आहे. पैकीच्या पैकी मार्क घेतलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.
हरियाणाच्या फरिदाबादमधील एकाच केंद्रातील सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत. त्यामुळे याप्रकरणी गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी कोर्टामध्ये दोन याचिका दाखल आहेत. मात्र, कोर्टाने एमबीबीएसची प्रवेश प्रक्रिया स्थगित न करण्याचा निर्णय घेतला आहे. नीट-यूजी परीक्षा ५ मे २०२४ रोजी घेण्यात आली होती. निकाल ४ जून रोजी जाहीर झाला होता.
१५६३ विद्यार्थ्यांसाठी २३ जून रोजी पुनर्परीक्षा
कॉन्सिलिंगवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. १५६३ विद्यार्थ्यांसाठी २३ जून रोजी पुनर्परीक्षा होणार असल्याची माहिती एनटीएने न्यायालयात दिली आहे. पूर्णपणे परीक्षा रद्द करणे योग्य नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे. एनटीएला दोन आठवड्यांत याचिकांवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने आजच्या सुनावणीमध्ये दिले आहेत.
३० जूनपूर्वी लागणार निकाल
या परीक्षेचा निकाल ३० जूनपूर्वी लावला जावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. १५६३ विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क हे ग्रेस मार्कांशिवाय दिले जाणार आहेत. एनटीएने दिलेली माहिती कोर्टाने नाकारली आहे. बाकी २ याचिकांवर न्यायालयाने पुढील दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे.