अजमेर : अयोध्येत बाबरी पाडल्यानंतर १९९३ मध्ये देशभरात मुंबईसह सहा ठिकाणी ट्रेन्समध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते. यातील एक आरोपी अब्दुल करीम टुंडा याची अजमेरच्या टाडा कोर्टाने सुटका केली आहे. तर इतर दोन आरोपी इरफान आणि हमीदुद्दीनं यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १९९३ मध्ये कोटा, लखनौ, कानपूर, हैदराबाद, सूरत आणि मुंबई या शहरांमधील ट्रेन्समध्ये सिरियल बॉम्ब ब्लास्ट झाले होते. या प्रकरणावरील सुनावणीवर सरकारी वकीलांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, टुंडा याची कुठल्या कारणांमुळे सुटका झाली, यावर निकालाचे वाचन केल्यानंतर टिप्पणी करता येईल.
सीबीआयने टुंडाला या स्फोटांचा मास्टरमाईंड ठरवले होते. तसेच २०१३ मध्ये नेपाळच्या बॉर्डरवरुन त्याला अटक झाली होती. टुंडा याच्यावर देशातील विविध ठिकाणी दहशतवादी कारवायांप्रकरणी खटले सुरु आहेत. टुंडा याने कथितरित्या तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिले होतं. एक पाकिस्तानी नागरीक जुनैदसोबत त्याने १९९८ मध्ये गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी हल्ला केल्याची योजना आखली होती.
कोण आहे टुंडा?
मुंबई बॉम्ब ब्लास्टमध्ये सहभागी होण्यापूर्वी टुंडाने जालीस अन्सारीसोबत मुंबईत मुस्लीम समुदयासाठी काम करण्याच्या उद्देशाने तंजीम इस्लाह उल मुस्लीमीन नावाची संस्था स्थापन केली होती. मध्य दिल्लीच्या दरियागंजमध्ये छत्ता लाल मिया भागात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या टुंडाने आपल्या वडिलांचे गाव गाझियाबादमध्ये सुतारकाम सुरु केले होते. त्यानंतर त्याने भंगार व्यवसायही केला. ८०च्या दशकात पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयच्या एजंट्सच्या माध्यमातून तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. त्यानंतर तो एक कट्टरपंथी बनला.