32.7 C
Latur
Thursday, February 20, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदे सेनेला पुन्हा धक्का!

शिंदे सेनेला पुन्हा धक्का!

आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा हटविली, आता एकच रक्षक

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचे कामकाज सुरू झाले. परंतु या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री बनलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता फडणवीस सरकारने शिवसेना आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा काढून घेतली. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला असून, तशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. शिवसेना नेत्यांसोबतच भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आल्याचे समजते.

ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परंतु यावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नाराजीचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे. १७ फेब्रुवारीपासून शिवसेनेच्या आमदारांची सुरक्षा काढून घेतली. आता यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे शिंदे म्हणाले. महायुतीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आमदारच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला.

यापूर्वी वाय प्लस असलेली सुरक्षा ही वाय दर्जाची करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाय श्रेणी ही सुरक्षेचा तिसरा स्तर आहे. यामध्ये ११ जणांचे पथक सुरक्षा देत असते. त्यात एक किंवा दोन कमांडो आणि एक पोलिस अधिकारीही असतो. मंत्र्यांची सुरक्षा कपात करताना आमदारांची सुरक्षाच काढून घेतल्याची माहिती आहे.

१७ फेब्रुवारीपासून शिवसेना आमदारांची सुरक्षा काढून घेतली. यामुळे आमदार नाराज झाल्याची माहिती मिळाली. शिवसेना आमदारांनी याबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली आपबिती मांडली. त्यावेळी शिंदे यांनी या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

भाजप- राष्ट्रवादी नेत्यांची सुरक्षा कपात
ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा व्यक्तींची सुरक्षा कमी केली. यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील लोकप्रतिनिधी आहेत. त्यात प्रतापराव चिखलीकर, सुरेश खाडे यांच्यासह अनेक जणांची सुरक्षा कपात केली. त्यामुळे आमदारांसोबत एकच सुरक्षा रक्षक असणार आहे. यावरून नाराजी व्यक्त होत आहे.

भाजप-शिवसेनेत शीतयुद्ध?
विधानसभा निवडणुकीपासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. त्याची सुरुवात शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यापासून झाली. त्यानंतर खातेवाटप, पालकमंत्रिपद यावरून दोन्ही पक्षांत चढाओढ पाहायला मिळाली. शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेले काही निर्णय रद्द केले. त्यामुळे धुसफूस अधिक वाढली. वैद्यकीय गरजवंतांसाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष असताना शिंदेंनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सुरू केला. यावरून जोरदार शीतयुद्ध असल्याची चर्चा आहे.

कोणत्या श्रेणीत काय सुरक्षा
-झेड प्लस सुरक्षेत ५५ सुरक्षा कर्मचारी असतात. त्यात एक पोलिस अधिका-यासह दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात.
-झेड श्रेणी सुरक्षेत २२ कर्मचा-यांची सुरक्षा असते. यामध्ये चार किंवा पाच एनएसजी कमांडो आणि एका पोलिस अधिकारी असतो.
-वाय श्रेणीत ११ सैनिकांची सुरक्षा कर्मचारी असतात. त्यात एक किंवा दोन कमांडो आणि एक पोलिस अधिकारीही असतो.
-एक्स श्रेणीत ५ किंवा २ सुरक्षा कर्मचारी असतात. त्यात एक सशस्त्र पोलीस अधिकारी असतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR