सोलापूर : इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू झालेल्या रणजी सामन्यात पहिल्या दिवसाअखेर दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत दिसून आली. पहिल्या डावात सौराष्ट्राचा संघ २०२ धावात गुंडाळला. दुपारनंतर महाराष्ट्र संघाने फलंदाजी सुरू केली मात्र महाराष्ट्राचा अर्धा संघ दिवसाअखेरपर्यंत तंबूत परतला. महाराष्ट्र संघाची धावसंख्या ६ बाद १०४ एवढ्या कायम राहिला.
सुरवातीच्या चौथ्या षटकातच हितेश वाळुंज याने सौराष्ट्र संघाला पहिला धक्का दिला. संघाची ११ अशी धावसंख्या असताना केविन जिवराजनी अवघ्या (६) धावांवर पायचीत होऊन तंबूत परतला. त्यापाठोपाठ विश्वराज जडेजा याला सुद्धा हितेश वाळुंजने सहाव्या षटकात शून्य धावांवर परत पाठवले. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने सावध भूमिका घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला परंतु १०व्या षटकात हितेश वाळुंज हा पुन्हा एकदा वरचढ ठरला. त्याने चेतश्वर पुजारा याला पायचीत केले.
दुस-या सत्रात धर्मेंद्र जडेजा व पारेख मंकड यांनी डाव सावरला. दोघांमध्ये सहाव्या विकेट साठी ११८ धावांची शतकी भागीदारी झाली. पारेख मंकड याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. परंतु ५६ धावांवर त्याला तरनजितसिंग धिल्लन याने पायचीत केले. धर्मेंद्र जडेजा एका बाजूने लढत असताना त्याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. ७२ धावा केल्यानंतर त्याला हितेश वाळुंज याने कौशल तांबे द्वारे झेलबाद केले. त्यानंतर सौराष्ट्र संघाचा हितेश वाळुंज व तरणजित सिंघ धिल्लन या दोघापुढे पूर्ण संघाने गुडघे टेकले. अवघा संघ चहापाण्यापर्यंत २०२ धावांवर गारद झाला. हितेश वाळुंज याने सहा बळी तर तरणजीत धिल्लन याने चार बळी घेतले.
महाराष्ट्र संघ फलंदाजीसाठी आला असता सुरुवात निराशाजनक झाली. सहाव्या षटकात ओम भोसले अवघ्या ७ धावावर बाद झाला. त्यानंतर कौशल तांबे व अंकित बावणे यांनी डाव सावरत दुस-या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. २० व्या षटकात अंकित बावणे वैयक्तीक ३४ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर कौशल तांबे सुद्धा लगेच माघारी परतल्याने महाराष्ट्र संघ एकापाठोपाठ एक गडी गमावत गेला. केदार जाधव (३) तर, सिद्धार्थ म्हात्रे (११) यांनी धावा केल्या. सौराष्ट्रकडून फिरकी गोलंदाज धर्मेंद्र जडेजा याने ४ बळी आणि युवराज सिंग दोडिया यांनी २ बळी घेतले. दिवसअखेर महाराष्ट्र संघ २९ षटकात ७ गडी बाद ११६ धावा करू शकला. सौराष्ट्र संघाची महाराष्ट्र संघावर आणखी ८६ धावांची आघाडी आहे. पंच म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पंच वीरेंद्र शर्मा (हिमाचल प्रदेश) तर रंजिव शर्मा (पंजाब) तर मॅच रेफ्री म्हणून बाळकृष्ण मिष्किन (गोवा) हे काम पाहत आहेत.