31.9 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रस्कूल बसचा प्रवास १८ टक्क्यांनी महागला; पालकांच्या खिशाला कात्री

स्कूल बसचा प्रवास १८ टक्क्यांनी महागला; पालकांच्या खिशाला कात्री

पुणे : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वीच एसटीच्या तिकिट दरात वाढ करण्यात आली होती. त्यापाठोपाठ रिक्षा-टॅक्सीचीदेखील भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता शालेय बसच्या भाड्यात १८ टक्के वाढ करण्यात येणार असल्याची माहिती शालेय बस संघटनेने दिली आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून पालकांच्या खिशाला फटका बसणार आहे.

स्कूल बस ऑपरेटर्स असोसिएशनचे अनिल गर्ग यांनी सांगितले की, शालेय बस उत्पादकांकडून बस आणि सुट्या भागांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. देखभाल खर्च महागला आहे. चांगली सेवा आणि सुरक्षितता नियमांचे पालन करण्यासाठी चालक, महिला मदतनीस आणि व्यवस्थापकांना पगारवाढ द्यावी लागते. शिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. पार्किंग शुल्क दुप्पट झाले आहे. आरटीओचा दंड वाढल्याने खर्चात आणखी भर पडली आहे. या वाढत्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी ही शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या शैक्षणिक वर्षापासून अर्थात १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. दरम्यान, विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरल्या जाणा-या अवैध वाहनांवर राज्य सरकारने बंदी घातल्यास भाडेवाढ होणार नाही, असेही ‘एसबीओए’ने स्पष्ट केले. मुंबईसह राज्यात शालेय बसव्यतिरिक्त रिक्षा, टॅक्सींमधूनही विद्यार्थी वाहतूक केली जाते. ही वाहतूक बेकायदा आहे. राज्य सरकारने बेकायदा विद्यार्थी वाहतुकीला आळा घातल्यास दरवाढ रद्द करण्यात येईल, असे एसबीओएचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी एका वृत्तपत्राला सांगितले आहे.

१ फेब्रुवारीपासून रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ
मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात ३ रुपयांनी तसेच कॅबच्या दरात ८ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे. नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडे आकारणीचा चार्ट देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR