मानवत : केवळ सामाजिक सुधारणा नव्हे तर सामाजिक क्रांती व्हावी यासाठी स्वा. सावरकरांनी स्वत:पासून सुरुवात केली. राष्ट्र बळकट करण्यासाठी परस्परामधील भेद मिटवून हिंदू समाज एकसंघ केला असे प्रतिपादन डॉ. मंजुषा चौधरी यांनी केले.
शिक्षक पालक संघाच्या वतीने आयोजित शारदोत्सव व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प गुंफताना सामाजिक समरसता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणाताई करपे होत्या. पुढे बोलताना डॉ. चौधरी यांनी सांगितले की, स्वा. सावरकरांनी पतितपावन मंदिराची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा व नित्यपूजा बहुजन समाजाकडून करून घेतली. हिंदू उपहारगृह सुरु केले. सहभोजनचे आयोजन केले. पं. दिनानाथ मंगेशकर, वि.स. खांडेकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीत सहभोजन कार्यक्रम आयोजित करून मतभेदाची दरी मिटविण्याचे प्रयत्न केले.
अखिल हिंदू भगिनींचा सामुदायिक हळदी-कुंक कार्यक्रमाचे सातत्याने १३ वर्ष यशस्वी आयोजन केले. सातत्याने दलित वस्त्यामध्ये भेटी दिल्या. १३ आंतरजातीय विवाह लावले. अशा प्रकारे सामाजिक क्रांतीसाठी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन लता भरड यांनी तर आभार उदयकुमार जैन यांनी मानले.