22.3 C
Latur
Monday, October 21, 2024
Homeपरभणीलज्जा हे सौंदर्याचे आभूषण : स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

लज्जा हे सौंदर्याचे आभूषण : स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

सेलू : जीवनामध्ये आपले सौंदर्य टिकवायचे असेल तर नेहमी संकोचाने वागा. संकोच म्हणजेच लज्जा हे सौंदर्याचे आभूषण आहे. त्यामुळे गोंडसपणा निर्माण होतो. एवढेच नव्हे तर संकोच्यामध्ये आकर्षण टिकून ठेवण्याची शक्ती असते, असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी आशीर्वाचनपर बोलताना केले आहे.

सेलू येथील नूतन विद्यालयाच्या हनुमानगढ परिसरात जयप्रकाश विजयकुमार बिहाणी आणि बिहाणी कुटुंबियांतर्फे आयोजित श्रीरामकथेत रविवार, दि.२० ऑक्टोबर रोजी स्वामीजी बोलत होते. पुढे बोलताना स्वामीजी म्हणाले की, रामायणातून मर्यादेचे प्रदर्शन होते. मात्र आपण सगळ्याच मर्यादा ओलांडत आहोत. शुभविवाह संदर्भात बोलताना ते म्हणाले की, प्री वेडिंग फोटोग्राफी पूर्णपणे चुकीची आहे. माणसाने माणसासारखे वागावे. एवढेच नव्हे तर माणसाने धार्मिक माणसासारखे वागावे. प्रेमातून झालेले विवाह अपवाद वगळता, अल्पकाळच टिकतात. कारण तिथे मर्यादा पाळल्या जात नाहीत. कोणतीही अमूल्य शिदोरी ज्याप्रमाणे आपण पुरवून पुरवून खात असतो.
अगदी त्याचप्रमाणे सुख आणि आनंद देखील पुरवून पुरवून खाता आला पाहिजे.

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धती इतकी सुरक्षित पद्धती कुठलीच नाही. कारण भांडताना देखील मर्यादा ठेवाव्या लागतात. त्यामुळे जीवनात मांगल्य निर्माण करायचे असेल तर मर्यादा आणि लज्जा खूप महत्त्वाच्या असल्याचे स्वामीजींनी स्पष्ट केले.

लोभाने माणसे आंधळी होतात
आजोळाहून आल्याबरोबर भरत व शत्रुघ्न अयोध्येत कैकयी मातेच्या महालाजवळ येतात. त्यावेळी कैकेयीमाता भरताचा राज्याभिषेक होणार या आनंदाने सोन्याच्या ताटात आरती घेऊन भरताला ओवाळतात. त्यावेळी महाराज दशरथ यांचे प्रेत तेलामध्ये बुडवून ठेवलेले होते. अंत्यविधी झालेला नव्हता. मात्र, अशाही परिस्थितीत लोभामुळे कैकेयीमातेने प्रसन्न चेह-याने भरताला तिलक केले. ओवाळून स्वागत केले. कारण लोभाने माणसे आंधळी होतात. याचेच हे मोठे उदाहरण असल्याचे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी आशीर्वचनपर बोलताना सांगितले. अयोध्येतील सर्व परिस्थिती भरताला सांगितल्यानंतर भरताने कैकेयीमातेला विचारले रामाचे कुठे चुकले? त्यावेळी कैकेयीमाता भरताला उद्देशून म्हणाल्या की काय बोलतोस रामाबद्दल? त्यामुळे काही काही वेळेस शत्रूची वाक्य सुद्धा महत्त्वाची असल्याचे स्वामीजींनी स्पष्ट केले.

देवाकडे काहीही न मागणे सर्वोत्तम भक्ताचे लक्षण
नावाडी केवटाने प्रभूरामचंद्रांना गंगेच्या पैलतीरावर सोडल्यानंतर प्रभुंनी केवटाला काहीतरी देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी भगवती सीतेने स्वत:च्या हातातील रत्नजडित अंगठी केवटाला देण्यासाठी काढली. त्याप्रसंगी केवटाने मला काहीही नको असे म्हणत रत्नजडीत अंगठी नाकारली. देवाकडे काहीही न मागणे हे सर्वोत्तम भक्ताचे लक्षण आहे. तसेच याच प्रसंगात प्रभूरामचंद्र केवटाला काहीतरी देऊ इच्छितात. मात्र, त्यांच्याजवळ काहीही नाही हा भाव भगवती सीतेने ओळखून तात्काळ आपल्या हातातील अंगठी काढली. ज्या पत्नीला आपल्या पतीच्या मनातील भाव ओळखता येतो. हे सर्वोत्तम पत्नीचे लक्षण आहे. तसेच जगातील सर्वोत्तम श्रोता म्हणजे बजरंगबली हनुमान हे आहेत. कारण कोठेही श्रीराम कथा सुरू असेल तेथे तेथे श्रीरामकथा ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात असेही यावेळी बोलताना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले.

पूर्वजांच्या कथा प्रेरणादायी
प्रभूश्रीरामांचे पुर्वज महाराज आयुष्यमान, महाराज दिलीप, महाराज भगीरथ या तीन पिढ्या भगवती गंगामातेला पृथ्वीवर आणण्यासाठी खर्ची पडल्या होत्या. केवळ त्यांच्या तपामुळे गंगा येथे आली. म्हणून पूर्वजांच्या कथा या प्रेरणा म्हणून ऐकायाच्या असतात. त्या प्रेरणादायी असतात. कथा प्रेरणेच्या प्रवाहात असतात. म्हणून आपल्याकडे कथांची परंपरा आहे. जिजामातेने छत्रपती शिवरायांना देखील अशाच प्रेरणादायी कथा सांगून त्यांच्यात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची क्षमता निर्माण केली. प्रत्येकाने रोज काहीतरी नित्य नियमांचे पालन केले पाहिजे. हा सनातन धर्म आहे. यातून व्यक्तित्व घडते. नियम कसे पाळावेत हे प्रभूश्रीरामचंद्राकडून शिकावे, असेही स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी स्पष्ट केले.

कथास्थळी अवतरली पंढरी
येथील श्रीराम कथा स्थळी नियमित एका तीर्थक्षेत्राची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. रविवारी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह वारकरी वेशभूषेतील देखावा सादर करण्यात आला. यावेळी वारीतील उभे रिंगण यासह सजीव प्रतिकृती तयार करण्यात आली होती. उपस्थित भाविकांना क्षणभर आपण पंढरपूर येथील वारी सोहळ्यात असल्याची अनुभूती आली म्हणून कथास्थळी पंढरी अवतरली असेच म्हणावे लागेल. यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भूमिकेत प्रा. संजय पिंपळगावकर, संत तुकाराम महाराज यांच्या भूमिकेत नागेश देशमुख होते. वारक-यांच्या वेशभूषेत डाके महाराज, भालचंद्र गांजापुरकर, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर तर आश्वारुढ सतिश आकात होते. देखाव्याला स्वामीजी यांच्यासह उपस्थित भाविकांनी भरभरून दाद दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR