नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी चांगलीच रंगत आणली. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना तगडे आव्हान शांतिगिरी महाराजांनी उभे केले.
यामुळे नाशिकमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. नाशिकमध्ये नक्की कोण बाजी मारणार हे चार जूनला स्पष्ट होणार आहे. आता शांतिगिरी महाराजांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत. नाशिक लोकसभेची निवडणूक शांतिगिरी महाराजांनी अपक्ष लढवली. त्यानंतर शांतिगिरी महाराज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी शनिवारी वाराणसीला रवाना होणार आहेत.
वाराणसीत आमचा भक्त परिवार आहे, असा दावा शांतिगिरी महाराजांकडून करण्यात आला आहे. वाराणसीत साधू-महंतांची ते भेट घेणार आहोत. नरेंद्र मोदी हे माझे राजकारणातील आदर्श असल्याने मी त्यांच्या प्रचारासाठी जात असल्याची माहिती शांतिगिरी महाराजांनी दिली आहे. यावेळी पत्रकारांनी तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहात का? असे विचारले असता भाजपमध्ये जायचे की नाही हे आम्ही निकालानंतर ठरवू, असे त्यांनी सांगितले.