मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील शासकीय विकासकामे करणा-या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासकीय कामांची जवळपास ८९ हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे कंत्राटदार संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे ५ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करत असल्याचा इशारा या संघटनानी दिला. राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ या दोनही संघटनांची मंगळवारी बैठक होणार आहे. त्यावेळी पुढील रणनिती ठरविली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यामुळे या निवडणूक काळात योजनांचा आणि विकास कामांचा पाऊस पाडला गेला. प्रत्येक आमदाराला खुश करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला. विकास कामेही सुरु झाली. मात्र आता निधी वितरीत होत नसल्याने कंत्राटदार हैराण झाले. या विकासकामांचा जवळपास ८९ हजार कोटी रुपयांची थकबाकी वाढली आहे. त्यामुळे ५ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.
विभागनिहाय थकित निधी
सार्वजनिक बांधकाम : ४६ हजार कोटी
जलजीवन मिशन : १६ हजार कोटी
ग्रामविकास : ८६०० कोटी
जलसंधारण : १९७०० कोटी
नगरविकास अंतर्गत आमदार निधी, खासदार निधी आणि डीपीडीसी फंड : १७०० कोटी
सर्व विभाग : एकूण ८९ हजार कोटी