नवी दिल्ली : कुवेतमध्ये बांधकाम मजुरांच्या इमारतीला लागलेल्या आगीत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ४२ जण भारतीय होते. तसेच या भीषण दुर्घटनेत सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाच्या सुपर हर्क्युलस विमानाने कुवेतच्या दिशेने उड्डाण केले आहे. या विमानातून भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणण्यात येणार आहेत.
भारतीय हवाई दलाचे सुपर हर्क्युलस सी१३०जे हे मालवाहू विमान आहे. मोठ्या प्रमाणावर भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणायचे असल्याने सरकारने हे विमान कुवेतमध्ये पाठवले आहे. हे विमान उद्यापर्यंत भारतात परतेल असंही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या दरम्यान ही भीषण आगीची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर कालच परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह हे कुवेतला रवाना झाले आहेत. याठिकाणी पोहोचताच सिंह यांनी जखमी मजुरांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. तसंच ज्या भारतीय मजुरांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची नुकसान भरपाई पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आहे. अल मनगाफ नावाच्या इमारतीला आग लागली होती जी दक्षिण कुवेतमधील अल अहमदी इथे होती. एबीटीसी या बांधकाम कंपनीने ही इमारत आपल्या मजुरांच्या निवासासाठी भाड्याने घेतली होती. या ठिकाणी एकूण १९५ मजूर राहत होते.