मुंबई : गुढीपाडव्याच्या संध्याकाळी मालाड पूर्व येथे निघालेल्या कलश यात्रेदरम्यान २ गटांत तणाव निर्माण झाला. भगवा झेंडा फडकवणा-या २ तरूणांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. पिंपरीपाडा येथील शोभा यात्रेत जात असताना या तरूणांनी झेंडा फडकवल्यावरून वाद झाला. त्यानंतर या तरूणांना मारहाण झाली. या प्रकरणी ४ जणांना अटक केली आहे. ज्याठिकाणी राडा झाला तिथे सध्या तणावाची परिस्थिती असून पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ज्या लोकांनी हे कृत्य केले. हिंदू समाजावर हल्ला केला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या लोकांना अटक करावी. जर हिंदू समाजातील तरूण भगवा झेंडा घेऊन जात असतील तेव्हा औरंगजेब प्रवृत्तीचे काही लोक त्यांना हे बघवत नाही. त्यामुळे हा हल्ला झाला. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी बजरंग दलाचे गौतम रावरिया यांनी म्हटले.
तर मालाडमधील घटना गंभीर आहे. माध्यमातून ही घटना पाहायला मिळाली. जर अशा प्रवृत्ती नववर्षाच्या दिवशी हिंदू सणाला अशाप्रकाराने वागणार असतील तर ही प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपला सण साजरा करावा. दुस-याच्या सणात व्यत्यय आणणे, मारहाण करणे योग्य नाही. या प्रकाराची निश्चितच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह खाते दखल घेतील आणि संबंधितांवर योग्य कडक कारवाई होईल असे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले.