श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात उद्या सोमवारी मतदान होत आहे. या मतदानाबाबत उत्सुकता आहे. परंतु अनंतनाग आणि शोपियॉं या जिल्ह्यांत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शोपियॉंमधील हल्ल्यात भाजपचे कार्यकर्ते आणि माजी सरपंचाचा मृत्यू झाला, तर अनंतनागमधील पहलगाम येथे पर्यटन स्थळावर झालेल्या गोळीबारात एक दाम्पत्य जखमी झाले.
यामुळे काश्मिरात दहशत पसरली असून, कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, मतदानाच्या वेळी काश्मिरात हल्ल्याचे सावट असल्याने दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. अनंतनागमधील पहलगाव येथे सध्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. दहशतवाद्यांनी काल रात्री यन्नार भागात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात तबरेज आणि फराह हे दाम्पत्य जखमी झाले. हे दोघेही राजस्थानमधील जयपूर येथे राहणारे असून, काश्मीरमध्ये पर्यटनासाठी ते आले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिस आणि लष्करी जवानांनी तातडीने या भागाचा ताबा घेत नाकाबंदी केली. येथे दक्षता बाळगली जात असतानाच शोपियॉं जिल्ह्यांत भाजपचे नेते एजाज शेख यांची गोळ््या झाडून हत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.