राजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये ‘अब की बार, चारशे पार’ अशी घोषणा केली आहे. त्यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यामध्ये ‘अब की बार ४५ पार’ ही घोषणा आपण पूर्ण करायची आहे. त्यासाठी महायुतीचा धर्म पाळून आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांची अनामत जप्त करूया, असे आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
शिवसंकल्प अभियानांतर्गत येथील राजीव गांधी क्रीडांगणावर कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
मुंबई, ठाणे हे शिवसेनेचे शरीर असले, तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे शिवसेनेची फुफ्फुसे आहेत. अशा या कोकणाच्या विकासासाठी शासन सकारात्मक असून त्यातून कोकणाला विकासात्मक एक नंबर करण्याची खात्री देतो. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ते पूर्णत्वास नेण्याचा निश्चितच प्रयत्न करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.