नवी दिल्ली : यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये काही खास घोषणा नसल्या तरी अर्थमंत्र्यांनी केलेली एक घोषणा आश्चर्यकारक वाटणारी आहे. लोकसंख्या नियंत्रण आणि लोकसंख्या बदलाचे मूल्यांकन करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. देशाची लोकसंख्या १४३ कोटींपेक्षा अधिक आहे. यामुळे निर्माण होणा-या समस्या, संकटांवर ही समिती केंद्र सरकारला माहिती देणार आहे.
भारतासमोर मोठ्या लोकसंख्येचे संकट उभे ठाकणार आहे. कमी होत चाललेली शेतीची उत्पादनक्षमता, बेरोजगारी, पायाभूत सुविधा, घरे आदी अनेक गोष्टींची तूट येत्या काळात भासणार आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची भूक कशी मिटवायची, पाणी कसे पुरवायचे आदी गोष्टी सरकारसमोर आवासून उभ्या राहणार आहेत. या आव्हानांचा लेखाजोखा मांडण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात येणार आहे.
लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्येतील बदलामुळे निर्माण होणा-या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार एक उच्चाधिकार समिती स्थापन करेल. या समितीला उच्च अधिकार असतील. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ही समिती आपल्या शिफारशीही सरकारला देईल. सामाजिक बदल लक्षात घेऊन सरकार हा प्रस्ताव तयार करत असल्याचे सीतारामन म्हणाल्या.
वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे अत्यावश्यक
वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याचा मुद्दा जोरात सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही मांडला जात आहे. लोकसंख्येचे असंतुलन झाले तर देशासमोर मोठी गंभीर परिस्थिती उभी राहिल. जिकडे रोजगार मिळतायत, अन्न पाण्याची सोय होतेय तिकडे हे लोंढेच्या लोंढे स्थलांतरीत होऊन तेथील व्यवस्थाही बिघडवू शकतात. यामुळे सरकार आतापासून सावध झाले आहे.
फायदे आणि तोटे
लोकसंख्या जास्त असण्याचे फायदे असतात, तसे तोटेही असतात. लोकसंख्या वाढीचे काही लाभ निश्चित आहेतच. फायदा एक असतो तो म्हणजेच एखादी मोठी बाजारपेठ घरातच उपलब्ध होणार आहे. जनतेची क्रयशक्ती अर्थकारणाला ऊर्जितावस्थेत ठेवत असते आणि या चक्राभोवती फिरणारी इतर चक्रे म्हणजे रोजगार निर्मिती. घरे, बांधकाम व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि या सर्वांवर होणारी गुंतवणूक. या वाढत्या लोकसंख्येला आज घर, पाणी, वीज, अन्नधान्य, आरोग्य आदी मूलभूत सुविधा पुरवण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. जर यातील उत्पन्न किंवा अन्य बाबींमध्ये तफावत निर्माण झाली तर गरीब-श्रीमंतांमधील दरी अधिकच वाढत जाणार आहे. अधिक लोकसंख्या म्हणजे देश उभारण्यासाठी जेवढे हात अधिक तेवढेच खाणारी तोंडे व त्यांच्यासाठी केलेल्या परिपूर्णतेचे प्रयत्न हेही मोठ्या संकटाला आव्हान देणारे असेल.