नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुरुवार दि. २० मार्च रोजी छत्तीसगडच्या विजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलांनी २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मोहिमेबद्दल माहिती दिली आणि ३१ मार्च २०२६ पूर्वी देश नक्षलमुक्त होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून छत्तीसगडच्या गांगलूर पीएस हद्दीजवळील विजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. दोन्ही बाजूंनी बेच्छूट गोळीबार झाला, ज्यात सुरक्षा दलांनी चकमकीत २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीनंतर सुरक्षा दलाने २२ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली. दु:खद बाब म्हणजे, या चकमकीत विजापूर डीआरजीचा १ जवान शहीद झाला आहे.
अमित शाह काय म्हणाले?
सुरक्षा दलांला मिळालेल्या या यशाबद्दल गृहमंत्री अमित शाहांनी सोशल मीडिया हँडल वर पोस्ट केली. ते म्हणाले, नक्षलमुक्त भारत मोहिमेच्या दिशेने आज आपल्या जवानांनी आणखी एक मोठे यश मिळवले आहे. छत्तीसगडच्या विजापूर आणि कांकेरमध्ये आमच्या सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये २२ नक्षलवादी ठार केले. मोदी सरकार नक्षलवाद्यांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ ठेवून पुढे जात आहे. भारत देश पुढील वर्षी ३१ मार्चपूर्वी नक्षलमुक्त होईल, अशी प्रतिक्रिया अमित शाहांनी दिली.