मुंबई : पक्ष फोडा आणि भ्रष्टाचार करा हीच सध्या मोदी गॅरंटी आहे. तुमचा पक्ष तुम्ही फोडा आणि आमच्यात या मग आम्ही तुम्हाला पवित्र करू ही सध्याची मोदी गॅरंटी आहे असे म्हणत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर टोलेबाजी केली आहे. आजचा निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नाही. अमित शहा आणि मोदी यांच्या मालकीचा हा आयोग झाला आहे असेही संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला असेही त्यांनी म्हटले आहे.
‘‘जे शिवसेनेबाबत झाले तेच शरद पवारांबाबत घडले. पक्षाचे संस्थापक बसले आहेत निवडणूक आयोगासमोर जाऊन, निवडणूक आयोगाने पक्ष दुस-याच्या हातात सोपवला. यालाच सध्या मोदी गॅरंटी म्हणतात. मोदी गॅरंटी कुठली असेल तर हीच की पक्ष फोडा, भ्रष्टाचार करा, आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावर हल्ले करू, ईडी लावू, सीबीआय लावू. त्यानंतर तुमचाच पक्ष तुम्ही फोडा आणि आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला पवित्र करू आणि आमच्याबरोबर घेऊ ही मोदी गॅरंटी. नॅशनालिस्ट करप्ट पार्टी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. अजित पवारांवर सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. आज काळाने त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे. तोच पक्ष मोदी आणि शहा यांनी अजित पवारांना दिला.
निवडणूक आयोगाने हा पक्ष अजित पवारांना दिला. निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग नाही तर मोदी-शहा यांचा निवडणूक आयोग आहे. मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचा बदला घ्यायचा आहे म्हणून हे सगळं चाललं आहे.’’ असे म्हणत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
जिथे ठाकरे तिथे शिवसेना, जिथे पवार तिथे राष्ट्रवादी. संजय राऊत पुढे म्हणाले, ‘‘शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे १०० टक्के शुद्ध मराठी अस्मिता जपणारे पक्ष आहेत. महाराष्ट्रात अन्याय झाला तर आवाज उठवणारे पक्ष होते. त्या दोन्ही पक्षांची वाताहात करून भाजपाने दाखवून दिले की आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतला आहे. मात्र या राज्याची जनता हा सूड उलटवून लावल्याशिवाय राहणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना आणि जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्रातल्या जनतेचे धोरण आहे.’’ असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.