31.9 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरे-शिंदेच्या भवितव्याचा बुधवारी ऐतिहासिक फैसला

ठाकरे-शिंदेच्या भवितव्याचा बुधवारी ऐतिहासिक फैसला

मुंबई : प्रतिनिधी
सत्ता आणि शिवसेनेवरील वर्चस्वासाठी गेले दीड वर्ष सुरू असलेल्या उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाचा फैसला बुधवारी होणार आहे. शिवसेनेच्या आमदारांविरोधात दोन्ही बाजूने दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निर्णय देणार असून या निर्णयावर शिंदे यांचे व त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे भवितव्य ठरणार आहे. निकालाच्या दोन दिवस आधी झालेल्या नार्वेकर व मुख्यमंत्र्यांमधील गुप्त भेटीबद्दल जोरदार आक्षेप घेताना देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही, हे ठरवणारा निकाल असेल, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली तर लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते व आमच्याच बाजूने निकाल लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

जून २०२२ मध्ये विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ होऊन सत्तातर झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. सत्तेबरोबरच शिवसेना व धनुष्यबाण हे चिन्हही ठाकरेंकडून हिसकावून घेतले. तेव्हापासून शिवसेनेच्या दोन गटांत घमासान संघर्ष सुरू आहे. एक वर्ष सर्वोच्च न्यायालयात लढाई झाल्यानंतर अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू होती. या लढाईचा फैसला बुधवारी दुपारी होणार आहे.

ठाकरे गटाचा दावा मान्य झाला व पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेले आमदार अपात्र ठरले तर सरकार कोसळेल. शिंदे अपात्र ठरणारच नाहीत व ठरले तरी तेच मुख्यमंत्री राहतील. त्यांना विधान परिषदेवर निवडून आणू, असे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केले आहे तरीही हे सोपे नाही. त्यामुळे विजयाची खात्री असूनही शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सोबत उरलेल्या आमदारांपैकी आदित्य ठाकरे वगळता उर्वरित १४ जणांविरुद्ध शिंदे गटाने अपात्रता याचिका दाखल केली आहे. ते अपात्र ठरणार का? हाही कळीचा मुद्दा असणार आहे. तसे झाल्यास गेले दीड वर्ष संघर्ष करणा-या उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसेल; पण त्याची सहानुभूतीही मिळणार आहे.

दोन्हीपैकी कोणाच्या आमदारांवर अपात्रतेची कु-हाड कोसळणार की, ही फूट नव्हे तर बहुसंख्य आमदारांनी केलेला नेतृत्वबदल आहे, असा मध्यम मार्ग काढून दोन्ही बाजूच्या आमदारांना अभय मिळणार या बद्दल कमालीची उत्सुकता आहे. निकालाबाबत शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून परस्परविरोधी दावे केले जात असले तरी यामुळे राज्यातले राजकीय वातावरण मात्र तापले आहे.

लोकशाही जिवंत राहणार की नाही कळेल
उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन उद्याचा निकाल हा केवळ शिवसेनेसाठी नव्हे संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा असणार असून देशातली लोकशाही जिवंत राहणार की नाही उद्या कळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष दोन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटले. ज्यांच्यावर लवाद म्हणून न्यायदानाची जबाबदारी आहे तेच न्यायधीश दोन वेळा आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर याचा काय अर्थ काढायचा? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

बहुमत, मेरिट आमच्या बाजूला : मुख्यमंत्री
विधानसभा अध्यक्षांकडे या प्रकरणाची विस्तृत सुनावणी झाली आहे. आता निकाल येईल. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. विधानसभा आणि लोकसभेत आमच्याकडे बहुमत आहे. आमच्याकडे अधिकृत चिन्ह आहे. मेरिटप्रमाणे निकाल अपेक्षित आहे. नियम सोडून कुठलेही काम केलेले नाही. घटनाबा काम आम्ही केलेले नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तर योग्य कायदेशीर अशा प्रकारचाच निर्णय अध्यक्ष घेतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

घटनात्मक पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे : शरद पवार
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीका केली. ज्यांच्याकडून निकालाची अपेक्षा आहे, त्यांनी ज्यांच्यावर सुनावणी सुरू आहे त्यांची भेट घेणे हे संशयास्पद आहे. हे केले नसते तर या पदाची प्रतिष्ठा आणखी चांगली राहिली असती, असे पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR