सुरत : वृत्तसंस्था
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरत आणि बिलिमोरा स्थानकांदरम्यान, बुलेट ट्रेन चालवली जाऊ शकते.
दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणा-या या बुलेट ट्रेनबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ३०० किमी लांबीचा वायाडक्ट तयार झाला आहे. त्याशिवाय गुजरातमधील सूरतजवळ ४० मीटर लांबीच्या बॉक्स गर्डरचं काम सुरू झालं आहे.
बुलेट ट्रेनच्या ३०० किमी मार्गावरील २५७ किमी मार्गाची निर्मिती ही फुल स्पॅन लाँचिंग तंत्रज्ञानाच्या आधारावर करण्यात आली आहे. त्यामुळे काम अधिक वेगाने झाले. या दरम्यान, अनेक लांब नदी पूल, स्टील आणि पीएससी ब्रिज आणि स्टेशन बिल्डिंगही बांधण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या प्रकल्पामधील ३८३ किलोमीटर पीयर्स, ४०१ किमी फाऊंडेशन आणि ३२६ किमी गर्डर कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. या बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण ३ स्टेशन तयार होत आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बुलेट ट्रेनसाठी खास डेपोही बांधले जात आहेत. सारे काही नियोजनानुसार पार पडले तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला जपानमधील शिंकासेन ट्रेनचे डबे भारतात येऊ शकतात. तसेच ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरत आणि बिलिमोरा स्थानकांदरम्यान, बुलेट ट्रेन चालवली जाऊ शकते.