छत्रपती संभाजीनगर : अजूनही टोळी सापडत नाही. गेल्या दोन वर्षाचे सीडीआर निघाले पाहिजेत. म्हणजे टोळी कोण चालवत होते, हे समोर येईल. जात आणि बीड जिल्हा बदनाम झाला आहे. धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत गुंडगिरीला पाठबळ आणि साथ दिली. कारण हेच टोळी चालवत होते. बाकीच्यांना पुढे घालण्यात आले, मात्र टोळीचा म्होरक्या हाच आहे. भविष्यात पुरावे नष्ट झाले तर याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस आणि अजित पवार राहतील, असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चो-या दरोडे टाकणारे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत. धनंजय मुंडे या षडयंत्रामध्ये सहभागी आहेत, आम्हाला याची १०० टक्के खात्री आहे. मराठ्यांची गरज संपली, आता पुरावे नष्ट केले जाऊ शकतात, सिडीआर तपासले तर त्यांचे संबंध उघड होतील असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
ज्या मराठा समाजाने मदत केली आहे असे धनंजय मुंडे म्हणतात, आता त्या समाजाशीच ते गद्दारी करत आहेत. आता मराठ्यांची गरज संपली, त्यावेळी मराठ्यांची गरज होती, ते खोट बोलणारच, पण पाप जास्त दिवस झाकत नसते. टोळी आतमध्ये जाणार म्हणजे जाणारच. मात्र यांनी जर पुरावे नष्ट केले तर याला पूर्णपणे जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असतील असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,
धनंजय मुंडे गुंडगिरी थांबवत नाही, मी त्यांना कितीतरी वेळा सांगितले टोळी थांबवा, यामुळे तुमचे आणि समाजाचे वाटोळ होईल. पण त्यांना भान राहिले नाही. त्यांना वाटते टोळी मारा-मा-या, भांडण करून आपल्याला पैसे आणून देईल. पण त्यांना हे कळत नाही की यामुळे बीड जिल्ह्याचे किती नुकसान झाले आहे. धनंजय मुंडे हे अजूनही मग्रुरीमध्ये वागत आहेत असेही यावेळी जरांगे यांनी म्हटले आहे.