22.3 C
Latur
Monday, October 21, 2024
Homeमहाराष्ट्र‘महिलाराज’ नावालाच; राजकारणात दुय्यम स्थान!

‘महिलाराज’ नावालाच; राजकारणात दुय्यम स्थान!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील महिला नेत्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राजकीय, सामाजिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रांत महिलांनी झेंडा रोवला. आताच्या काळात महिला सर्व क्षेत्रांत पुढे येत आहेत असे आपल्याला वाटत असेल, १९६२ पासूनच राज्यातील राजकारणात महिला सक्रिय असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत असेल पण, त्याचे प्रमाण खूप कमी आहे. महिलांना उमेदवारी देण्याचे प्रमाण भलेही वाढले असेल मात्र त्यांना पाडण्याचे, संधी नाकारण्याचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर सातत्याने सुरू असतात, हे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

१९६२ पासून ते २०१९ पर्यंत महिला उमेदवारांची संख्या व विजयी महिलांची संख्या पाहत असताना १९६२ मध्ये ३६ महिलांनी निवडणूक लढविली होती, त्यातील १३ महिला विजयी झाल्या. १९६७ मध्ये १९ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील ९ महिला विजयी झाल्या. १९७२ मध्ये ५६ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील २६ महिला विजयी झाल्या. १९७८ मध्ये ५१ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील ८ महिला विजयी झाल्या.

१९८० मध्ये ४७ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील १९ महिला विजयी झाल्या. १९८५ मध्ये ८३ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील १६ महिला विजयी झाल्या. १९९० मध्ये १४७ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील केवळ ७ महिला विजयी झाल्या. १९९५ मध्ये २४७ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील केवळ ११ महिला विजयी झाल्या. १९९९ मध्ये ८६ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील १२ महिला विजयी झाल्या.

२००४ मध्ये १५७ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील १२ महिला विजयी झाल्या. २००९ मध्ये २११ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील ११ महिला विजयी झाल्या. २०१४ मध्ये २७७ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील फक्त २० महिला विजयी झाल्या. २०१९ मध्ये २३९ महिलांनी निवडणूक लढवली होती, त्यातील २४ महिला विजयी झाल्या.

राज्यात विधानसभा निवडणुका सुरू झाल्यापासून अर्थात १९६२ पासून ते २०१९ पर्यंत किती महिलांनी प्रत्यक्षात निवडणूक लढवली व त्यातील किती महिला विजयी झाल्या याची ही सविस्तर आकडेवारी होती.

महिलांचा राजकारणातील सहभाग
राजकारणातील महिलांचा सक्रिय सहभाग हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. हा सहभाग दोन पातळ्यांवर बघितला जाऊ शकतो, एक म्हणजे प्रत्यक्ष सहभाग घेऊन निवडणूक लढवणे आणि दुसरं म्हणजे मतदान प्रक्रियेत सहभाग घेणं. कोणत्याही निवडणुकीतील मतदानातील टक्केवारीचे प्रमाण काढताना तरुणांप्रमाणे महिलादेखील महत्त्वाचा घटक समजल्या जातात.

सबलीकरण गरजेचे : आज सर्वच क्षेत्रांत महिला यशस्वी होत आहेत, परंतु अनेक महिला अजूनही या सगळ्या यशापासून खूप दूर आहेत. त्यासाठी आजही महिला सबलीकरणाची गरज देशाला तसेच राज्याला आहे. अनेक ठिकाणी महिलांना समाजात तसेच घरात योग्य सम्मान मिळत नाही. मोलमजुरी करून आपले पोट भरणा-या महिलांची संख्या भरपूर आहे. अनेक महिला आजदेखील शिक्षणापासून वंचित आहेत. काहींना शिक्षण असूनसुद्धा कामाची योग्य संधी मिळत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR