मुंबई : विधिमंडळाच्या आवारात गुरुवारी संध्याकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या घटनेमुळे राज्य विधिमंडळाच्या प्रतिमेला बट्टा लागला होता. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी सभागृहात भाष्य केले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी मांडलेल्या प्रस्तावाचा आणि आव्हाडांच्या धमकीच्या मुद्द्याचा एकमेकांशी संबंध नाही, असा आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवला. यावर विरोधकांनी खळखळ करताच देवेंद्र फडणवीस हे संतापल्याचे पाहायला मिळाले.
धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मनाई नाही. अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी आपण राजकारणापलीकडे जाणार आहात की नाही? धमकीचा विषय वेगळा मांडता येईल. कालच्या घटनेने कोणा एका व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झालेली नाही. इथल्या बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आज बाहेर ज्या काही शिव्या पडत आहे, त्या एकट्या पडळकर किंवा यांच्या माणसाला पडत नाहीत. आपल्या सगळ्यांच्या नावाने याठिकाणी बोलले जाते, हे सगळे आमदार माजले आहेत. त्यामुळे या गोष्टी गांभीर्याने घ्या. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करुन आपण महाराष्ट्रातील जनतेला काय सांगणार आहोत. अशाप्रकारे समर्थन करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
अध्यक्ष महोदय आपण बोलत असताना असे म्हणालात की, नितीन देशमुख हे माझ्यासोबत आले होते. मी सभागृहात येताना मी रोज एकटा येतो. माझ्यासोबत मी कधीही कोणाला आणत नाही, माझ्यासोबत फक्त माझा पीए चालत असतो. त्याशिवाय माझ्यासोबत कोणीही नसते. मी कधीही कोणाच्या पासवर सही करत नाही किंवा कोणाला पास इश्यू करत नाही. रेकॉर्डवर चुकीचे येऊ नये म्हणून मी हे सांगत आहे. नितीन देशमुख आपल्या ताब्यात आहेत, त्यांना विचारा ते कसे आले होते.
मी हे कृत्य करण्यास भाग पाडले असा कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये. काल ही घटना घडली तेव्हा मी सभागृहात होतो. मी ही घटना घडली तेव्हा मरिनलाईन्सला होतो. या घटनेशी माझा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. ही घटना घडावी म्हणून मी कोणाला चिथावणी दिली का, खुणावले का, तर तसे मी केलेले नाही. या लोकशाहीच्या मंदिरात प्रत्येक दगडात लोकशाही जिवंत आहे. ही घटना कशी घडली, हे आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितले. त्याच्या जवळपासही मी दिसत नाही. जे झाले ते चुकीचे झाले त्याबद्दल मला वाईट वाटते असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.