मुंबई : २०१२च्या दिल्लीतील निर्भया बलात्कार-हत्याकांडाच्या घटनेनंतर तत्कालीन गृहमंत्र्यांनी देशभरात महिलांसाठी महिलांनी चालवलेली पोलिस ठाणी सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, याची अंमलबजावणी करण्यात पुरोगामी महाराष्ट्र अपयशी ठरले आहे. देशभरात अनेक ठिकाणी महिलांसाठीची पोलिस ठाणी असताना महाराष्ट्रात असे एकही ठाणे सुरू झाले नाही. स्वतंत्र महिला पोलिस ठाणे नसलेल्या राज्यांत महाराष्ट्राचा समावेश आहे. स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याची राज्याला अद्यापही प्रतीक्षाच आहे.
राज्यात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अश्लील कृत्यांसह लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सामाजिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. निर्भया बलात्कार-हत्याकांडानंतर प्रत्येक राज्यातील शहर आणि जिल्ह्यात स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्र सरकारने घेतला होता. मात्र, महाराष्ट्रात अजुनही एकही स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली नाही.
महिलांसंदर्भातील गुन्ह्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांना सक्षम करणे गरजेचे आहेत. त्यामुळे प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यात स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याच्या निर्मितीची गरज भासत आहे. कॉन्स्टेबल, पीएसआय आणि उपअधीक्षक पदांवर आरक्षण मिळाल्याने पोलीस ठाण्यांत महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. स्वतंत्र महिला पोलिस ठाण्याचा निर्णय वरिष्ठ स्तराची बाब असून महिलांप्रति संवदेनशील होण्याची गरज आहे. यामुळेच अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यास मदत होईल.
महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दखल घेत राज्यातील स्वतंत्र महिला पोलीस ठाणे नाशिक, नागपूर, मुंबई आणि पुणे शहरात सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. असे प्रस्तावही सरकारकडे असल्याचे माहिती आहे, पण याबाबत सध्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. महिला पोलिस ठाण्याच्या नावाने महाराष्ट्रात अधूनमधून केवळ गप्पाच सुरु असतात. तामिळनाडू, उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यासह तब्बल २५ राज्यात स्वतंत्र महिला पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली. तामिळनाडूत सर्वाधिक १९९ तर उत्तरप्रदेशात ७१ स्वतंत्र महिला पोलीस ठाणे सुरू झाले आहेत.
अन्य पोलीस ठाण्याप्रमाणेच संरचना
अन्य पोलीस ठाण्याप्रमाणेच स्वतंत्र महिला पोलीस ठाण्यांची संरचना असणार आहे. शहरातील अन्य पोलीस ठाण्यांत येणाऱ्या महिलांसंदर्भात सर्व तक्रारी या पोलीस ठाण्यात वर्ग केल्या जातील. पोलीस ठाण्यात महिला पोलीस निरीक्षकांसह ठाणे अंमलदार, बीट मार्शल, वाहन चालक, गुन्हे शोध पथक आणि पोलीस ठाण्यातील आस्थापनावरील सर्व कामकाज महिला कर्मचाऱ्यांकडे सोपवले जाईल.