35.1 C
Latur
Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रराज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा

राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री हवा

कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट : हर्षवर्धन सपकाळ

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करा व सुरक्षा मिळवा अशी फडणवीस सरकारची योजना असून महाराजांचा अवमान करणा-या प्रशांत कोरटकरला सुरक्षा देण्यात आली असताना तो पळून जातो. कोरटकरचे, आयपीएस अधिकारी व गृहमंत्री यांच्याशी जवळचे हितसंबंध होते, त्याला पळून जाण्यात पोलिसांचीच फूस असावी असा संशय व्यक्त करून कोरटकर पळून जात असताना सरकार काय करत होते? गृहविभाग झोपला होता काय? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा दुसरा व्यक्ती राहुल सोलापूरकर पुण्यात राहतो पण सोलापूरकरवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे पुण्याचे पोलिस आयुक्त सांगतात व त्याला पोलिस संरक्षण देतात. स्वारगेट बस स्टँडवर बलात्कार होतो, बीडमध्ये सरपंचाची क्रूर हत्या होते. परभणीत पोलिस कोठडीत तरुणाचा मृत्यू होतो, पुण्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण होते, दुस-या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची जळगावात छेड काढली व तक्रार दाखल करायला मंत्र्यांना पोलिस स्टेशनला जावे लागते.

राज्यात पोलिसांचा धाकच राहिला नाही. कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असून देवेंद्र फडणवीसांचा तुघलकी कारभार सुरू आहे. महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का, असा प्रश्न जनतेला पडला असून राज्यातील गृहविभागाचा कारभार पाहता राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्र्यांची गरज आहे, या शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर निशाणा साधला.

माफी मागण्याचा प्रश्नच नाही
राज्यातील कारभार पाहता तो क्रूर पद्धतीचा आहे म्हणून औरंगजेबाचा कारभार व फडणवीसांचा कारभार सारखाच आहे असे मी म्हणालो असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी असे म्हणून माझ्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण मी माझ्या विधानावर आजही ठाम आहे, माफी मागण्याचा प्रश्नच नाही असे सपकाळ म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR