नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मोदी सरकारने वर्षाला २ कोटी रोजगाराची गॅरंटी दिली होती. परंतु ते दिवास्वप्नच राहिले. त्यामुळे भाजपने लादलेली बेरोजगारी हा यंदाच्या निवडणुकीतील सर्वांत मोठा मुद्दा असल्याचा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी सोशल मीडियाद्वारे केला. आयआयटी, आयआयएम यांच्यासारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये शिकून बाहेर पडणा-या असंख्य युवकांना नियमित नोकरी मिळत नसल्याचेही खर्गे म्हणाले.
देशातील युवकांना रोजगार प्राप्तीसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारीचा दर तिपटीने वाढला आहे. दोन कोटी नोक-या देण्याची मोदी सरकारची गॅरंटी युवकांसाठी एका दु:स्वप्नासारखी ठरली आहे. देशातील किमान १२ आयआयटी अशा आहेत की त्यातून शिकून बाहेर पडलेल्या तीस टक्के युवकांना नोक-या मिळालेल्या नाहीत तर २१ ‘आयआयएम’मधील केवळ २० टक्के प्लेसमेंट पूर्ण झाले आहे. आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांची अशी भीषण अवस्था आहे. यातून भाजपने युवकांचे भविष्य कसे खराब केले आहे, याची कल्पना येते शकेल.
कॉंग्रेस रोजगार मागण्याचा कायदेशीर अधिकार देणार
वर्ष २०१२ ते २०१९ या कालावधीत रोजगारवाढीचा दर केवळ ०.०१ टक्के इतकाच होता, असे सांगून खर्गे म्हणाले, केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास युवा न्याय मोहिमेंतर्गत युवकांना रोजगार देण्याच्या मार्गातले अडथळे दूर केले जातील. २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या पदवी अथवा पदविकाधारकांना रोजगार मागण्याचा कायदेशीर अधिकार दिला जाईल. अशा युवकांना प्रतिवर्ष किमान एक लाख रुपये दिले जातील, असे ते म्हणाले.