पुणे – देशामध्ये उसाच्या लागवडीखालील क्षेत्र मोठे असले तरी उसाच्या उत्पादनात लक्षणीय सुधारणा होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.संस्थेच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
मांजरी येथील संस्थेच्या परिसरात संस्थेच्या नियामक मंडळाची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, संस्थेचे माजी महासंचालक आणि सल्लागार शिवाजीराव देशमुख, महासंचालक संभाजी कडू पाटील, नियामक मंडळ सदस्य राज्य सहकारी साखर कारखाना संघ अध्यक्ष पांडुरंग पाटील, राज्याच्या विविध भागातील साखर कारखान्यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात साखर उद्योग क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबाबत पुरस्कार प्रदान करण्यात आले.
उसाच्या कमी उत्पादनाची कारणमीमांसा करताना ते म्हणाले, हवामानातील बदल, चांगल्या बियाणांच्या वापराबाबत उदासिनता, अशास्त्रीय पाणी व्यवस्थापन, मातीची झीज, जमिनीचा कमी झालेला पोत, कीटक, रोग-तण नियंत्रणासाठी होणारे अपुरे प्रयत्न यामुळे कारखान्यांना उसाचा पुरवठा कमी होतो. उत्पादन वाढीसाठी शुद्ध बियाणांची गरज आहे.
इथेनॉलबाबत ते म्हणाले, सन २०२५ पर्यंत २० टक्के मिश्रण उद्दिष्ट असून याआधी दीड टक्का होती ती आता १२ टक्के इतकी झाली आहे. तसेच तेल कंपन्यांना ३८ कोटी लिटरवरून १३ पटीने वाढून ५०२ कोटी लिटर झाला आहे. त्यात राज्याचा वाटा १०४ कोटी लिटरचा आहे. यामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे, असे ते म्हणाले.
महासंचालक कडू पाटील यांनी सभेसमोर विविध प्रस्ताव मांडले. ते सर्व एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी आर्थिक, तांत्रिक कार्यक्षमता अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. सहकार मंत्री वळसे पाटील यांनी आभार मानले.