पुणे : पहलगाम येथे घडलेली घटना हा मोठा धक्का आहे. देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता नसते. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात समाजवादी लोक एकत्र आले होते आणि महाराष्ट्रात या विचारसरणीची मुळे खोलवर रुजली. पुणे जिल्ह्यात विशेषत: पुरंदर भागात समाजवादी लोकांचा प्रभाव अधिक राहिला आहे. या नेत्यांनी जाहिरातबाजी न करता, कुठल्याही अपेक्षा न ठेवता काम केले आहे. देश सध्या अडचणीतून जात आहे. पहलगाम येथे घडलेली घटना हा मोठा धक्का आहे. देशावर हल्ला होतो, तेव्हा मतभिन्नता नसते. आम्हाला विचारण्यात आले की, काय करावे, तेव्हा आम्ही सांगितले की, आज देश एक आहे, असे त्यांनी म्हटले.
कमतरतांवर चर्चा करण्याची वेळ नाही
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा उल्लेख करत शरद पवारांनी सांगितले की, त्या बैठकीत काही कमतरता आमच्याकडून झाल्या, हे नेतृत्वाने मान्य केले. पण आज देश संकटात असताना त्या कमतरतांवर चर्चा करण्याची वेळ नाही. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे. देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही, जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.