नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. पक्षातील नवीन सचिवांच्या नियुक्तीसोबतच काही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचीही नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये तामिळनाडू, केरळ, आसाम, हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांचा समावेश आहे. तसेच, काही विभागांचे प्रमुख देखील बदलले जाऊ शकतात, ज्यामध्ये एससी-एसटी विभागाचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या निवडणूक राज्यांमध्ये प्रभारी बदलले आहेत, त्या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षातील संघटनात्मक बदलांमध्ये जिल्हा युनिट्सकडे महत्त्वाचे निर्णय घेण्याचे काम सोपवण्याचा विचार केला जात आहे. सूत्रांनी सांगितले की, पक्षाच्या हायकमांडच्या बैठकीत जिल्हा काँग्रेस समित्यांभोवती (डीसीसी) पक्षाची पुनर्रचना करण्याच्या विचारावर चर्चा झाली.
ज्यामध्ये राज्य युनिट्सचे व्यवस्थापन अधिका-यांकडे सोपवण्यात आले आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीमध्ये काँग्रेस जिल्हा युनिट्सना महत्त्वाचे बनवू शकतो. सध्याच्या प्रक्रियेत डीसीसीपासून सुरुवात करून राज्य युनिट्सकडे आणि नंतर अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी)कडे शिफारसी पाठवल्या जातात.
दरम्यान, काँग्रेसच्या बैठकीत काहींनी सांगितले की, १९६० च्या दशकात एआयसीसीमध्ये बदल होण्यापूर्वी पक्ष जिल्ह्यांमध्ये संघटित होता. याशिवाय, जिल्हा युनिट्सच्या नेतृत्वाला रणनीती आणि प्रचारात मोठी भूमिका मिळू शकते, कारण पक्ष त्यांच्या सूचनांवर काम करत आहे.