रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर चालत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सगळे प्रवासी गाढ झोपेत असताना चालत्या बसने पेट घेतला मात्र हा सगळा प्रकार चालकाच्या लक्षात आल्याने बसमधील एकूण २२ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मंगळवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजेवाडी फाट्याजवळ औदुंबर ट्रॅव्हल्सची लक्झरी बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
औदुंबर ट्रॅव्हल्सची लक्झरी बस रत्नागिरीवरून मुंबई येथे निघाली होती. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्याजवळ आली असता बसचे टायर गरम होऊन फुटल्याने लक्झरी बसने पेट घेतला. आग लागल्याचे चालक गुलशन पठाण याच्या लक्षात येताच लक्झरी बस रस्त्याच्या साईडला घेऊन सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्यात आले. यावेळी बसमध्ये दोन चालकांसह २२ प्रवासी प्रवास करीत होते.