सोलापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकातील (भैय्या चौक) रेल्वे उड्डाणपुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यामुळे, यावरून होणारी जड वाहतूक लोखंडी बार लावून बंद करण्यात आली आहे. भैय्या चौक व मरिआई चौकात डाव्या बाजूला बार लावण्यात आल्याने, काही जड वाहने रॉगसाइडने घुसत आहेत रस्ता बंद असल्याचे माहीत नसल्याने अडचण होत असून, वाहतुकीची कोंडी होत आहे.
रेल्वे पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी एक वर्षापूर्वीच रेल्वे प्रशासनाने सोलापूर महानगरपालिकेकडे केली होती. या प्रकरणात महापालिकेने हात झटकल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी भैय्या चौक ते मरिआई चौकात लोखंडी बार लावून अवजड वाहतूक बंद केली. मात्र बहुतांश वाहनचालकांना याची माहिती नसल्याने ती रॉगसाइडने जात आहेत. समोरून येणारी वाहने व रॉगसाइडने जाणारे जड वाहन यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.भैय्या चौकात वाहतूक शाखेचा एक कर्मचारी नेमण्यात आला आहे, मात्र ड्युटी संपल्यानंतर ते निघून जातात. वाहने नेहमीप्रमाणे भैय्या चौकाच्या दिशेन किंवा मरिआई चौकाच्या दिशेने घुसत आहेत. समोर लोखंडी बार असून रस्ता बंद असल्याचे लक्षात येत आहे.
तेव्हां गाडी मागे घेऊन इतर रस्त्याने जाण्यास अडचणी येत आहेत. शिवाय दरम्यान वाहतुकीची कोंडी होत आहे.एक वर्षापूर्वीच अवजड वाहतूक बंद करून उड्डाणपुलाचे काम सुरू करणे आवश्यक होते. या एक वर्षात पुलाचे नुकसान झाले. आता अवजड वाहतूक बंद केली तर उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू केले पाहिजे. शिवाय माहिती सांगणार बोर्ड हा मोठा करून लावण्यात यावा. असे झाल्यास वाहनचालकांच्या लक्षात येणार आहे.रस्ता बंद असल्याचा बोर्ड नरसिंग गिरजी मिल चाळीच्या जवळ लावण्यात आला आहे. बोर्डावर जड वाहतुकीला पर्यायी मार्ग सुचविण्यात आला आहे. मात्र हा बोर्ड वाहनचालकांना सहज लक्षात येत नाही, त्यामुळे वाहने घुसत आहेत.