पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव मोर्चा काढणार असून हा मोर्चा जिल्ह्यातील काही भागातून जाणार आहे. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होऊ नये. तसेच कायदा व सुव्यसस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारपर्यंत (दि.२९) पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
हा मोर्चा जिल्ह्यात गुरुवार दि. २८ ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरीवरून नारायणगावमार्गे मंचर-खेड-चाकण-तळेगाव ते लोणावळामार्गे मुंबईकडे जाणार आहे. समाज बांधवांची गर्दी होणार असल्याने नगर-कल्याण मार्गावरील वाहतूक १४ नंबर जांबुत फाटा येथून नगरकडे जाणारी वाहतूक बोर-बेल्हे-अळकुटी-पारनेर-अहिल्यानगरमार्गे वळविली जाणार आहे.
नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक ओझर फाटा-कारखाना फाटा-शिरोली बुद्रुक मार्गे वळविण्यात आली आहे. तर नारायणगावकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुणे-नाशिक महामार्ग क्र. ५० व बायपास महामार्ग यावरील नारायणगावकडून चाकणकडे जाणारी वाहतूक नारायणगाव बायपासमार्गे कारफाटा-मंजर पोलिस स्टेशन-नागपूर-रोडेवाडीफाटा ते लोणी-पाबळ मार्गे शिक्रापूर-नगर रोडमार्गे पुणे अशी वळविण्यात आली आहे.
नारायणगावकडून येताना बायपास क्र. ६० मार्गे मंचर ते निघोटवाडी सरळमार्गे मोर्चा जाताना जीवन खिंड-मंचर शहर-अवसरी फाटा ते जीवन खिंड-नंदी चौक अशी वळविण्यात आली आहे. खेड शहराकडून पुण्याकडे जाणारी वाहने पाबळमार्गे जातील. जुन्या पुणे-मुंबई महामार्ग क्र. ४८ वरील वाहतूक नवीन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वळविण्यात आली असून चाकण-देहुरोडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्यावरुन द्रुतगती मार्गावरुन उर्से टोलनाकामार्गे मुंबईकडे वळविण्यात येईल.
मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहने वलवण एक्झिटवरुन लोणावळा शहरात न वळविता मुंबईकडे जातील. जुना मुंबई ते पुणे मार्गावरुन पुण्याकडे जाणारी सर्व वाहने खंडाळा-वलवण एक्झीटवरून लोणावळा शहरात अथवा जुन्या महामार्गावर न वळविता पुण्याकडे जातील. लोणावळा शहर परिसरातून पुणे व मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावरुन न जाता वलवण पुलावरुन द्रुतगती मार्गाने मुंबई व पुण्याकडे जातील.