मुंबई : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांनी नवी मुंबईतून उपोषण मागे घेतल्यानंतर मराठा आंदोलक परतीच्या प्रवासाला निघाले. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणा-या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने बोरघाटात वाहतूक प्रचंड मंदावली. त्यामुळे वाहनधारकांची प्रचंड तारांबळ उडाली. यामुळे वाहतूक कोंडीचाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे कसरत करून वाहनधारकांना वाट काढावी लागली.
मराठा आरक्षणासाठी आलेले बांधव आपापल्या गावी परतत असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी झाली होती. मराठा आंदोलक घरी परतत असतानाच आठवड्याचा शेवट असल्यानेही द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड संख्या वाढली. वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. वाशी येथे लाखो मराठा बांधवांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनात गर्दी केली होती. आंदोलन स्थगित करण्यात आल्याने मराठा आंदोलक परतीच्या वाटेवर लागले. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दहा-दहा मिनिटांचे ब्लॉक घेतला जात होता. मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवून त्या मार्गावरून पुण्याकडे येणारी वाहतूक सोडली जात होती. या ब्लॉकद्वारे महामार्ग पोलिस वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करीत होते.
मराठा आंदोलक परतले
दुसरीकडे, मराठा आरक्षणप्रश्नी वाशी मुंबईत तळ ठोकलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले आणि जरांगे यांना ज्यूस देत उपोषण सोडवले. यावेळी विजयी जल्लोष केल्यानंतर आंदोलक माघारी परतले.