मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असतानाच आता राज्यभरातील न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयातून तब्बल १०२५ न्यायाधीशांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये पुण्या-मुंबईसह बीड व इतर न्यायालयांमधील न्यायाधीशांचाही समावेश आहे.
मुंबई हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल समीर आडकर यांनी हे शनिवारी आदेश जारी केले आहेत. राज्यभरातील विविध जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये कार्यरत जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठस्तर व कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूण १०२५ बदल्यांमध्ये तब्बल २२२ जिल्हा न्यायाधीश आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, बीड, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद यांसह राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमधील न्यायाधीशांचा समावेश आहे. काही न्यायाधीशांना त्याच जिल्ह्यात पोस्टिंग मिळाली आहे.
पुण्यातील दहा जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या करÞण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जे. एल. गांधी, पी. पी. जाधव, बी. पी. क्षीरसागर, ए. एम. बुक्के, आर. के. देशपांडे, एस. बी. राठोड, ए. ए. घनिवळे, एस. आर. नरवडे, एस. एन. सचदेव आणि सरिता पवार यांचा समावेश आहे. बीडमधील ६ जिल्हा न्यायाधीशांचा समावेश आहे. बीड कोर्टातील एस. आर. पाटील, के. आर. जोगळेकर, अंबाजोगाई न्यायालयातील डी. डी. खोचे, एस. जे. घरत, केज न्यायालयातील के. डी. जाधव आणि माजलगांव न्यायालयातील बी. जी. धर्माधिकारी या न्यायाधीशांचा समावेश आहे.
दिवाणी वरिष्ठ स्तरातील ३३१ आणि कनिष्ठ स्तरातील ४७२ न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्येही बीड जिल्ह्यातील काही न्यायाधीशांचा समावेश आहे. हायकोर्टाकडून १९४ न्यायाधीशांना बढती देण्यात आली आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील एकाही न्यायाधीशांचा समावेश नाही. बीडप्रमाणेच इतर जिल्ह्यांमधील न्यायाधीशांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.