बुलडाणा : शेतक-यांचे नेते रविकांत तुपकर शेतक-यांचे प्रश्न घेऊन बुलडाणा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहे. दिल्ली दरबारी शेतक-यांचे प्रश्न मांडण्यासाठी मी बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणारसुद्धा, असा विश्वास तुपकरांनी व्यक्त केला आहे. लोकवर्गणीतून ते निवडणूक लढणार आहेत.
मी गेल्या २० वर्षांपासून शेतक-यांच्या प्रश्नावर संघर्ष करत आहे. त्यामुळे मी १०० टक्के संसदेत जाणार, ज्या प्रश्नासाठी मी लढतोय त्या प्रश्नाचे मूळ दिल्लीत असल्याने सगळ्या शेतक-यांचा आणि तरुणांचा माझ्यावर दबाव आहे की, तुम्ही लोकसभा निवडणूक लढून दिल्लीला जायला पाहिजे अन् सरकारला आमचे प्रश्न सोडवायला भाग पाडलं पाहिजे. म्हणून येणारी लोकसभा निवडणूक मी लोकसहभागाने आणि लोकवर्गणीतून लढणार आहे, असे तुपकरांनी स्पष्ट केले आहे.
‘मी फाटका माणूस आहे, माझ्याकडे पैसे नाहीत. मी भ्रष्टाचार करत नाही. माझ्याकडे नंबर दोनचे पैसे नाहीत, त्यामुळे ‘एक व्होट आणि एक नोट’ या तत्त्वावर मी निवडणूक लढणार आहे. बुलढाणा जिल्हा हा आत्महत्याग्रस्तांचा जिल्हा असल्याचे बोलले जाते. मला हा कलंक पुसायचा आहे. कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळवून देणे हे माझं पहिलं काम असेल. नवीन शिक्षण प्रणाली आणणे आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी सभागृहात मी हे विषय मांडणार,’असे तुपकर म्हणाले.