मुंबई : प्रतिनिधी
महापालिकेच्या उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्यांनी आपला जीव गलावल्याची हृदयद्रावक घटना मुंबईत घडली आहे. हे दोन्ही चिमुकले रविवारपासून बेपत्ता होते.
ते आज पालिकेच्या उद्यानातील पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळून आले. माटुंगा येथील जोसेफ हायस्कूलच्या मागील महर्षी कर्वे गार्डनमध्ये ही घटना घडली. मृत चिमुकले हे भाऊ असल्याची माहिती आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
करण (वय ४ वर्षे) आणि अंकुश (वय ६ वर्षे) अशी मुलांची नावे असून दोघे भाऊ असल्याची माहिती आहे. महर्षी कर्वे गार्डन येथील पाण्याची टाकी पातळ प्लास्टीकने झाकून ठेवलेली होती. त्यामुळे करण आणि अंकुश हे या पाण्याच्या टाकीत पडले. मुले बेपत्ता असल्याने कालपासून त्यांचा शोध सुरु होता. अखेर ते आज या पाण्याच्या टाकीत आढळून आले. या घटनेने पालिकेचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला असून त्यामुळे एका कुटुंबाला आपली दोन मुले गमवावी लागली आहेत.