नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील ५७ लोकसभा मतदारसंघांतील प्रचार आज संपला असून येत्या शनिवारी या मतदारसंघांमध्ये मतदान होईल. बिहार (८), हरियाना (१०), झारखंड (४), ओडिशा (६) उत्तरप्रदेश (१४), पश्चिम बंगाल (८) आणि दिल्लीतील सात मतदारसंघांचा यात समावेश आहे.
केंद्रीय मंत्री सुभाष सरकार, माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय, भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल, ज्येष्ठ नेते भर्तुहरी महताब, युवा नेते कन्हैय्याकुमार, अभिनेता राज बब्बर, माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा यांच्यासह ८८९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत दोन रोड शो करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा विविध मतदारसंघांमध्ये रोड शो केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघात मनोज तिवारी यांच्यासाठी रोड शो केला.