32.2 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रधरणातील पाणीसाठा समाधानकारक

धरणातील पाणीसाठा समाधानकारक

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील धरणातला पाणी साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला असला तरीही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या. सध्या अठरा जिल्ह्यातील ६४४ गावे आणि २०५१ वाड्याना ७९६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

राज्याच्या अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत टंचाई स्थितीचा आढावा सरकारने घेतला. राज्यातल्या धरणातील पाणी साठा आणि पाणी पुरवठा याबाबतचे सादरीकरण जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले. राज्यातील धरणातील पाणी साठा अद्यापही समाधानकारक आहे.

पाणी टंचाई जाणवत असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्याप परिस्थिती चांगली आहे. गेल्या वर्षी याच तारखेला राज्यात २५६४ टँकर सुरू होते. मात्र सध्या ७९६ टँकर सुरू आहेत. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षी २६३ टँकर सुरू होते. यावर्षी मात्र अद्याप एकही टँकर सुरू करावा लागलेला नाही. मात्र तरीही संभाव्य परिस्थिती गृहीत धरून पाणी पुरवठा बाबतचे नियोजन करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

अठरा जिल्ह्यांत ७९६ टँकरने पाणीपुरवठा
राज्यात सद्यस्थितीत ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, अमरावती, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या १८ जिल्ह्यात शेवटचा पर्याय म्हणून टँकरने ६४४ गाव आणि २०५१ वाड्यांमध्ये एकूण ७९६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. संभाजीनगर महसुली विभागात सर्वाधिक म्हणजेच, एकूण २७५ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सर्वाधिक, १९२ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

राज्यातील एकूण पाणीसाठा
२४ एप्रिल २०२४ आणि २४ एप्रिल २०२५ ची स्थिती
मोठी धरणे: ८५५९ दलघमी/ आज: १०४०१ दलघमी
मध्यम धरणे: २४३८ दलघमी/ आज: २५७२ दलघमी
लघु धरणे: २०२५ दलघमी/ आज: २१०१ दलघमी

राज्यातील प्रमुख धरणातील उपयुक्त पाणी साठा
( धरणांचे नाव, २४ एप्रिल २०२४ रोजीचा साठा, २४ एप्रिल २०२५ रोजीचा साठा)
गोसीखुर्द, ९.४७, ५.६७,
तोतलाडोह २०.४६, २०.७४,
ऊर्ध्व वर्धा ९.९७, ९.६४.
जायकवाडी ८.८७, ३३.५१
मांजरा ०.२८, २.०३
हतनूर ४.५१, ४.५१
गंगापूर २.४८, ३.०७
कोयना ३५.९८, ३४. १४
खडकवासला १.०६, ०.९६
भातसा १२.९१, १४.६५
धामणी ०.०७, ०.०७.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR