मुंबई : ईद निमित्त भाजप ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला ‘सौगात-ए-मोदी’ कीट देणार असल्याचे म्हटले जात आहे. यावरून विरोधकांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही यावरून भाजपवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘सौगात-ए-मोदी’ म्हणजे ‘सौ चुहे खाके के बिल्ली हज को चली’ अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही ‘सौगात’ देत असताना दर वर्षी दोन कोटी रोजगार देणार, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दिडपट भाव देणार, विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, पेट्रोल ४० रुपये तर डिझेल ३५ रुपये लिटरने देणार, अशी आश्वासने २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिली होती, त्या ‘सौगात’ची देश आजही वाट पहात आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी एक राजकीय व्यक्तीमत्व म्हणून २००२ साली गुजरात मध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर उदयाला आले. या दंगलीत मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकावर अत्याचार झाले, त्यांचे मॉब लिंचिंग झाले, ही सर्व जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे असे तत्कालीन परिस्थितीत म्हटले गेले. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जगाला, देशाला ओळख झाली. पुढे राजकारण करत असताना अल्पसंख्याक सामाजाला एकही तिकीट न देणे, एकही मंत्रीपद न देणे, मोदींच्या पक्षातील आणि त्यांच्या मातृसंस्थेतील सहका-यांनी या समाजावर अत्यंत खालच्या भाषेत अपमानजनक वक्तव्ये व अत्याचार केले. हे सर्व पाहता सौगात-ए-मोदी म्हणजे सौ चुहे खा के बिल्ली हज को चली, असे आहे, या शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, भाजप सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, याचे उदाहरण म्हणजे ‘सौगात ए मोदी’ हा कार्यक्रम. ३२ लाख कुटुंबांच्या घरोघरी जाऊन भाजप कार्यकर्ते सौगात म्हणजेच भेट देणार आहेत. हे सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. म्हणून भाजपने हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करावे, असे आव्हान उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.