मुंबई : शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देहू येथे श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार देण्यात आला. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आहे. कारण, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला देहू येथील वारक-यांनी दिला. हा माझ्या एकट्याचा पुरस्कार असून तो वारकरी, धारकरी, शेतक-यांचा आणि लाडके भाऊ-बहिणींचा असल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले.
मुख्यमंत्री असताना तीर्थक्षेत्राबाबत जे निर्णय घेतले, त्यामुळे हा पुरस्कार मला दिला. वारकरी समाज प्रबोधन करतात, त्यांच्याकडून मिळालेला हा पुरस्कार सर्वात मोठा आहे असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटले. या पुरस्कार सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटविण्यासंदर्भात सुरू असलेल्या मागणीवरही आपली भूमिका मांडली. औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटविण्यावरुन सुरू असलेल्या वादावर पहिल्यांदाच शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. शिवभक्तांच्या भावनांचा आदर मी करतो, औरंगजेबाने संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. संभाजी महाराज यांचे शौर्य आणि औरंगजेबाचे क्रौर्य, त्या क्रौर्याची परिसीमा त्याने गाठली होती. अशा औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नये. क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये. तो महाराष्ट्राचा दुश्मन होता, देशद्रोही, राष्ट्रद्रोही होता, अशा या औरंग्याच्या खाणाखुणा महाराष्ट्रात कशाला पाहिजे. जे उदात्तीकरण करतात त्यांचा निषेध केला पाहिजे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.