मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजीचा सूर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. रायगडचे पालकमंत्रिपद हे महायुतीत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आले तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजी वाढली. कारण नाशिकसाठी दादा भुसे तर रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले इच्छूक होते. त्यावरून तिढा कायम असतानाच आता हा वाद मार्गी लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद मिळावे, अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही इच्छा होती. मात्र त्यांना पालकमंत्रिपद मिळाले नाही, त्यांच्याऐवजी आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळाले तर नाशिकचे पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांना मिळाले. यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची बातमी समोर आली. त्यानंतर महायुती सरकारने रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. अखेर आता हा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
अडीच वर्षांचा तोडगा?
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा काळ ठरण्याची शक्यता आहे. पहिले अडीच वर्षे राष्ट्रवादी तर दुस-या अडीच वर्षांची टर्म शिवसेनेला मिळणार असल्याची शक्यता आहे. पहिले अडीच वर्षे अदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्रीपदी राहण्याची शक्यता आहे तर दुस-या अडीच वर्षांत पालकमंत्रिपद हे भरत गोगावले यांना मिळण्याची शक्यता आहे.