मुंबई : प्रतिनिधी
वादग्रस्त वक्तव्ये व विधानसभेत मोबाईलवर पत्ते खेळतानाची चित्रफित बाहेर आल्याने गोत्यात आलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांनी त्यांची कानउघाडणी केल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा अशी चूक होणार नाही, अशी हमी दिली. या भेटीनंतर कोकाटे मंत्रिमंडळ बैठकीला हजर राहिल्याने त्यांचे मंत्रिपद वाचणार; पण काही दिवसांनी कृषी खाते काढले जाईल, अशी चर्चा आहे.
कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांबरोबरच छावा संघटनेचाही मोठा दबाव होता. त्यामुळे आज अजित पवार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माणिकराव कोकाटे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेतली. या दोघांची तब्बल तासभर चर्चा झाली. अजित पवार यांनी कोकाटेंकडून वारंवार होणा-या चुकांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तुमच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. किती वेळा तुम्हाला वाचवायचे? किती वेळा माफ करायचे? असा सवाल अजितदादांनी केल्याचे समजते. कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
अजित पवार यांनी त्यांना कुठलेही आश्वासन दिले नाही; परंतु मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले. यामुळे कोकाटे यांना आणखी एक संधी मिळणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन लोकांचा रोष कमी करण्यासाठी त्यांचे कृषिखाते अन्य कोणाकडे सोपवले जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

