नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी होणा-या सहाव्या फेरीत एकूण ८६९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी ८६६ जणांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले असता यातील १८० जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत व ३३८ उमेदवार कोट्यधीश असल्याचे आढळले आहे. निवडणूक लढविण्याबाबत महिलांची उदासीनता कायम असून या टप्प्यातील ९२ म्हणजे केवळ ११ टक्के महिला उमेदवार आहेत.
एडीआरच्या माहितीनुसार सहाव्या टप्प्यात निवडणूक लढवणा-या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले. या टप्प्यात २७१ उमेदवार २५ ते ४० वयोगटातील आहेत. १८० उमेदवारांनी स्वत:वर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे म्हटले, त्यातील १४१ जणांवर गंभीर गुन्हे आहेत. १२ जण गुन्हेगारी खटल्यांत दोषी सिद्ध झाले आहेत. सहा जणांविरुद्ध हत्येचे व २१ जणांवर हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे आहेत. २४ उमेदवारांवर महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत व त्यातील तिघांवर बलात्काराचे गुन्हे आहेत. द्वेषपूर्ण भाषणे करणा-या १६ जणांवरही गुन्हे दाखल आहेत.
पक्षनिहाय आकडेवारी
सहाव्या टप्प्यातील ‘आप’चे सर्व पाच आणि राष्ट्रीय जनता दलाच्या चारही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. समाजवादी पक्षाच्या १२ पैकी ९, भाजपच्या ५१ पैकी २८, काँग्रेसच्या २५ पैकी आठ, तृणमूलच्या नऊपैकी चार व बिजू जनता दलाच्या ३९ पैकी दोन उमेदवारांनी आपल्यावर गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे.
कोट्यधीश उमेदवार
सहाव्या टप्प्यात भाजपचे सर्वाधिक ४८ उमेदवार कोट्यधीश आहेत. दुस-या क्रमांकावरील काँग्रेसच्या २० उमेदवारांनीही आपल्याकडे किमान एक कोटीहून अधिक संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक उमेदवाराकडे सरासरी ६ कोटी २१ लाख रुपयांची संपत्ती आहे. जिंदाल यांच्या पाठोपाठ ओडिशाच्या कटकचे बिजद उमेदवार सत्राप्त (४८२ कोटी) यांचा क्रमांक आहे.
१३ उमेदवार निरक्षर
या टप्प्यातील ३३२ (३८ टक्के) उमेदवार पाचवी ते बारावीदरम्यान शिक्षण झालेले आहेत. सर्वाधिक ४८७ (५६ टक्के) उमेदवारांनी पदवी व त्यावरील शिक्षण घेतल्याचे जाहीर केले आहे. २२ उमेदवार पदविकाधारक आहेत. १२ जण केवळ साक्षर आहेत, १३ उमेदवार निरक्षर आहेत.