पाटणा : विविध खटल्यांमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून तुरुंगात असलेले बिहारचे यूट्यूबर मनीष कश्यप शनिवारी पाटणा उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर बाहेर आले. तब्बल नऊ महिन्यांनंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. पाटणा येथील बेऊर तुरुंगातून बाहेर आल्यावर समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. पाटणा हायकोर्टाने बुधवारी त्यांना दोन खटल्यांमध्ये जामीन मंजूर केला होता. त्यांना यापूर्वीच ११ प्रकरणात जामीन मिळाला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कश्यप म्हणाले की, बिहारचा डीएनए इतका खराब नाही की ते घाबरतील. यापुढेही ते पूर्वीप्रमाणेच पत्रकारिता करत राहतील, कुणालाही घाबरणार नाहीत.
तमिळनाडूमध्ये असलेल्या बिहारमधील स्थलांतरित मजुरांवर कथित हल्ल्याचा बनावट व्हीडीओ कश्यपच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसारित केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध १३ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची कलमेही लावण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये मदुराई न्यायालयाने या कायद्यातील कलमे हटवली आहेत. मनीष कश्यपने याच वर्षी १८ मार्च रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्यांना बिहार तुरुंगात ठेवण्यात आले, नंतर तामिळनाडूला नेण्यात आले होते. मात्र, ऑगस्टमध्ये एका खटल्यात हजर राहण्यासाठी त्यांना तामिळनाडूहून बिहारमध्ये आणण्यात आले आणि तेव्हापासून ते पाटणा येथील बेऊर तुरुंगात बंद होते.