लातूर : प्रतिनिधी
चैत्र महिण्याच्या अखेरीस व वैशाख महिण्याच्या सुरूवातीस तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सीअस पर्यंत वाढल्याने लातूर जिल्हयातील २०५ गावे, ४३ वाडया, तांडयावर पाणी टंचाईच्या झळा कमालीच्या जानवत आहेत. जिल्हयात तीव्र पाणी टंचाई जाणवणा-या भागात अधिग्रहणांची संख्या वाढत-वाढत आज घडीला २९५ वर आली आहे. गेल्या दोन दिवसात आवकाळी पाऊस झाल्याने तापमानात कांही अंशी घट झाली असली तरी पाणी टंचाई मात्र दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
गेल्यावर्षी लातूर जिल्हयात झालेला अल्प पाऊस, कडक उन्हामुळे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी टंचाई जाणवणा-या ग्रामपंचायतींनी ३३६ गावांसाठी, ६९ वाडयांसाठी ६३४ अधिग्रहणाद्वारे नागरीकांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून पाणी टंचाइचे प्रस्ताव पंचायत समितीच्याकडे पाठवले होते. सदर प्रस्तावांची पाहणी करून पंचायत समिती स्तरावरून तहसिल कार्यालयाकडे २७७ गावे, ५४ वाडयांना ४७५ अधिग्रहणाची गरज असल्याचे कळवण्यात आले होते. त्यानुसार तहसिल कार्यालयांनी पाहणी करून २०५ गावे, ४३ वाडयांना २९५ अधिग्रहण मंजूर केले आहेत. त्यामुळे २४८ गावे, वाडयांना अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा होत आहे.
अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक ६२ अधिग्रहणे
ग्रामीण भागात नागरीकांना अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. शिरूर अनंतपाळ तालुका वगळता इतर ९ तालुक्यात अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा होत असून यात सर्वाधिक अहमदपूर तालुक्यात ६२ अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. रेणापूर तालुक्यात ५८ अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा, निलंगा तालुक्यात ४४ अधिग्रहण, लातूर तालुक्यात ४२, औसा तालुक्यात ३८, उदगीर तालुक्यात २४, चाकूर तालुक्यात १५, जळकोट तालुक्यात ११, देवणी तालुक्यात १ अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा होत आहे.