शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
जात एकच माणसाची सोड वर्गीकरण मित्रा चल करू या काळजाचे आज रूंदीकरण मित्रा… अशा सामाजिक आशयाच्या गझल सादर करून उजेडच्या शिवारात बांधावरल्या कविता रंगल्या. शब्दपंढरी प्रतिष्ठान, दिलासा फाउंडेशन व जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने उजेड (ता.शिरूर अनंतपाळ) येथे ‘बांधावरल्या कविता’ हा पहिला कार्यक्रम पार पडला. मांजरानदी काठी वसलेल्या उजेड गावांत जतुसापचे प्रदेश सचिव बालाजी जाधव यांच्या शेतामधील बांधावर झाडावर जमलेल्या पक्षांचा किलबिलाट, आपल्याच मस्तीत शीळ घालणारा रानवारा व सोबतीला ‘बांधावरल्या कविता’ हे विहंगम दृश्य काव्यप्रेमी रसिकांना अनुभवता आले.
पेरणी केली आहे कर्ज सावकाराचे काढून.. मुसळधार बरसून पावसा बाहेर काढ संकटातून.. ही कविता सादर करून दिलीप लोभे यांनी पावसाची विनवणी केली. तर कवि अमरदीप पाटील, योगिराज माने, देवदत्त मुंढे, सतीश हानेगावे, राजेंद्र माळी, दयानंद बिराजदार यांस अनेक कंिवनी विविधांगी कविता सादर करून श्रोत्यांची दाद मिळविली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कवि देवदत्त मुंढे यांनी कविता सादर करून अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी जाधव यांनी केले. सूत्रसंचलन दयानंद बिराजदार यांनी तर प्रकाश जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आबासाहेब पाटील, विवेक जाधव व मित्रपरिवाराने परिश्रम घेतले. यावेळी उजेड परिसरातील काव्यरसिक बहुसंख्येने उपस्थित होते.