नवी दिल्ली : प्रतिनिधी
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी २० मे रोजी मतदान सुरु असताना पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. याविरोधात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाला तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचे विश्लेषण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिले.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान पार पडलं. २० मे रोजी मतदान प्रक्रियेदरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्ष तसेच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. याविरोधात आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली असल्याचा आरोप शेलार यांनी केला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.